प्राथमिक तपासात संशय, मात्र, अद्याप निश्चित निष्कर्ष नाही, पुढील संशोधन सुरू
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सध्या आंध्र प्रदेशाती एलुरू जिल्हय़ात एका गूढ आणि अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. हा आजार मासे आणि काही प्रकारच्या भाज्या यांच्या सेवनाने झाला असावा, अशी शक्यता प्राथमिक तपासानंतर व्यक्त करण्यात आली आहे. या आजाराची सध्या या जिल्हय़ातील 500 हून अधिक जणांना बाधा झाली असून 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हा आजार भाज्या आणि मासे यांच्या सेवनातून झालेल्या विषबाधेमुळे होतो, ही शक्यता व्यक्त झाली असली तरी अद्याप त्यासंबंधी निश्चित आणि अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकारनेही या शंकेला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे लोकांनी एकदम घाबरून जाऊ नये, असे सांगण्यात येत आहे.
या आजारात गोंधळल्यासारखे होणे, ताप येणे, श्वसनक्रिया बिघडणे, रक्त बिघडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांनी गंभीर स्वरूप धारण केल्यास रूग्णाच्या प्राणावरही बेतू शकते. अद्याप या आजाराने मृत झालेल्यांची संख्या रूग्णसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. मात्र, उपचार वेळेवर न घेतल्यास धोका वाढतो असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी जनतेला दिला आहे.
धातूंचे प्रमाण वाढल्यामुळे
या आजाराने ग्रस्त रूग्णांच्या रक्तात निकेल, शिसे अशा जड धातूंचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. हे धातू किंवा त्यांची संयुगे शरिरात श्वासावाटे किंवा पाण्यावाटेही मोठय़ा प्रमाणात जात नाहीत असे संशोधनाअंती दिसून आले आहे. तथापि, भाजी पिकविताना खते आणि कीटनाशके यांचा अतिवापर केल्यास या द्रव्यांमधील काही धातूंचा अंश भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे ही विषबाधात होऊ शकते, असे तपासाअंती दिसून आल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले.
मासेही प्रभावित
शेतांमध्ये टाकलेली खते किंवा पिकांवर फवारलेली कीटनाशके शेतातील पाण्याबरोबर वहात ओढे किंवा नद्यांमध्ये येतात आणि या पाण्यात राहणाऱया माशांच्या शरिरात प्रवेश करतात. असे मासे माणसाने खाल्ल्यास त्याच्या शरिरात या विषारी आणि जड धातूंचे प्रमाण वाढते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
उपाय काय ?
धातूयुक्त खते आणि कीटनाशकांचा उपयोग पिके घेताना कमीतकमी करावा. त्याऐवजी विद्राव्य आणि नैसर्गिक खते किंवा कीटनाशके उपयोगात अधिक प्रमाणात आणावीत. भाजी किंवा मासे व्यवस्थित धुवून आणि योग्य पद्धतीने स्वच्छ करूनच त्यांचे सेवन करावे. खते आणि कीटनाशके वारण्यासंदर्भात समान राष्ट्रीय धोरण असावे. हा आजार सध्या केवळ एका जिल्हय़ात असला तरी तो इतरत्र पसरू शकतो. त्यामुळे त्वरित उपाययोजना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.