प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील आयजीएम रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना प्रचंड अस्वच्छता व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांना बोलावून रोष व्यक्त केला. कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर परराज्य, जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना आयजीएम तथा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येत आहे. आजमितीस ८० नागरिकांना याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी असलेली अस्वच्छता व अन्य गैरसोयीमुळे मनस्ताप झालेल्या नागरिकांचा संयमाचा बाण सुटला.
त्यांनी स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांना बोलावून घेऊन वस्तुस्थिती दाखवली. यावेळी घाणेरडी स्वच्छतागृहे दाखवून गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी पाणीच नसल्याचे नागरिकांनी सांगितले. क्वारंटाईन केलेल्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याने व त्या ठिकाणी पंख्यांची सोय नसल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केला.
कोरोनासाठी राखीव असणारे आयजीएम हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी क्वारंटाईनसह संशयितांचा स्वॅब घेण्याचे काम केले जाते. शासनाने आतापर्यंत सुमारे १८ कोटींचा निधी या रुग्णालयासाठी मंजूर केला आहे. तरीही या रुग्णालयात नागरिकांची गैरसोय होत असेल तर ही खेदाची बाब असल्याचे अनेक नागरिकांनी यावेळी बोलून दाखवले.