दैनंदिन व्यवहार, व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत
प्रतिनिधी/ बेंगळूर
वेतनवाढ, महिलांना रात्रपाळीत काम करण्याची पद्धत रद्द करणे, किमान पेन्शन 10 हजार रुपये यासह अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी अनेक कामगार संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा कर्नाटकात फज्जा उडाला. राज्यात किरकोळ आंदोलने वगळता सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. त्यामुळे दैनंदिन जनजीवनावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही.
बेंगळूरसह राज्यभरात परिहवन मंडळाच्या बसेस नेहमीप्रमाणे सुरू होत्या. पण बंदमुळे गैरसोय टाळण्यासाठी अनेक जणांनी प्रवास टाळल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. शाळा-महाविद्यालये देखील नेहमीप्रमाणे सुरू होती. मॉल, चित्रपटगृहे, बाजारपेठा नेहमीप्रमाणे गजबजलेल्या होत्या. शेतकरी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यामुळे एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होती. स्टेट बँक ऑफ इंडियाशह काही बँका वगळता इतर बँक कर्मचाऱयांनी बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला.
बेंगळूरमध्ये मौर्य सर्कलपासून पिन्य औद्योगिक वसाहतीपर्यंत काही कामगार संघटनांनी मोर्चा काढला. राज्यातील प्रमुख शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार घडले. काही ठिकाणी रास्ता रोको करणाऱयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही ठिकाणी दुहाने, हॉटेल बळजबरीने बंद करण्याचे किरकोळ प्रकार घडले. महिकेरीहून म्हैसूरला जाणाऱया बसवर समाजकंटकांनी दगडफेक केली. चिक्कबळ्ळापूरमध्ये एका हॉटेलमालकावर काही जणांनी हल्ला केला. कोलारमध्ये बस आगाराला घेराव घालणाऱया सीपीएम पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तुमकूरमध्ये कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बीएसएनएल कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटविले. बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, शिमोगा, गदग या ठिकाणी विविध कामगार संघटनांनी शांततेत आंदोलन केले.