नवी दिल्ली :
sकोरोना संशयित रूग्णांच्या जलद चाचणीसह (रॅपिड टेस्ट), होम क्वारंटाईन असणाऱयांना सुविधा पुरविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना केले. कोरोनाला हरविण्यासाठी सर्व देशवासीयांची एकजूट आवश्यक आहे. आपल्या श्रद्धा आणि पंथ वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन करोनाला हरविण्याची गरज आहे, याची जाणीव सर्व धर्मगुरूंना करून द्या. विविध स्तरांमधील नागरिकांची बैठक घ्यावी. विविध धर्मातील धर्मगुरूंनी गावापासून जिल्हय़ापर्यत सर्व ठिकाणी बैठका घेऊन या महासाथीबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
देशासमोर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे
संवाद साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय
आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी
पंतप्रधान मोदी म्हणाले,
देशात दररोज रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यावरून कोरोना विषाणूविरोधातील युद्ध
आता कुठे सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्या सर्वांच्या श्रद्धा विश्वास आणि विचारसरणीवर
त्याने हल्ला केला. त्यामुळे सर्वांनी आपल्या श्रद्धा, पंथ आणि विचारसरणीचा बचाव करण्यासाठी
सर्वांनी एकत्रित येऊ कोरोना विषाणूविरोधातील लढा देण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन सक्षम करा
प्रत्येक राज्यांने जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन
अधिक सक्षम करण्यासाठी
प्रयत्नशील राहावे.
सद्यस्थिती सर्वांचे प्राधान्य हे कोरोना संशयित रूग्णांची जलद चाचणी करणे आणि क्वारंटाईनमध्ये
असणाऱयांना सुविधा पुरविण्यावर असावे. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ वाढविण्यात
यावी. तसेच आरोग्यसेवकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याबाबतही उपाययोजना करावी, असा सल्लाही
त्यांनी दिला.
निवृत्त डॉक्टर, आरोग्यसेवक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात यावी. या सर्व घटकांच्या मदतीने दोन व्यक्तींमधील सामाजिक अंतर (सोशल डिस्टेसिंग) योग्य ठेवण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कोरोना महासाथ ही जगासमोरील संकट आहे. याविरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एका सैनिकाप्रमाणे जागृक राहण्याची गरज आहे. शांतता, ऐक्य आणि कायदा व सुव्यवस्था अबांधित ठेवत कोरोनाची साखळी तोडणे यालाच सर्वांचे प्राधान्य हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.