वार्ताहर / गोकुळ शिरगाव
अतिवृष्टी पुरामुळे 23-जूलै पासून प्रादेशिक गांधीनगर व इतर 13 गावे पाणी पुरवठा योजनेचे दुधगंगा नदीवर कागल येथे असलेल्या जॅकवेलमधून पाणी उपसा पंपिंग बंद पडले होते. या जॅकवेलकडे जाण्यासाठी अंदाजे 1 कि. मी अंतरापर्यंत फक्त बोटीनेच जावे लागते. सदरची बोट कागल नगरपरिषदेच्या मालकीची आहे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी उपलब्ध करून दिली.
या वेळच्या पूरपरिस्थितीमध्ये या परीसरातील ऊस उंच वाढल्यामुळे तसेच येथील झाडे पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे बोटीने जॅकवेल पर्यंत जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
अशाही परिस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी जलसेवक यांनी आज दि.27-07-2021 रोजी धाडस करत बोटीमधून जॅकवेलमध्ये जात एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांच्या व कागल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुरामुळे नादुरुस्त झालेल्या इलेक्ट्रिक बाबींच्या आवश्यक त्या तांत्रिक दुरुस्त्या करून घेऊन जॅकवेल मधून आज दुपारी 2.30 वा. पाणी उपसा मशीनरी यशस्वीपणे चालू करण्यात यश मिळवले.
या साठी म.जी.प्रा. चे कार्यकारी अभियंता मा जे.डी. काटकर , गांधीनगर प्रादेशिक योजनेचे शाखा अधिकारी निळकंठ लोकरे, यांत्रिकी उपअभियंता उदय कांबळे, सुपरवायझर उमेश नरके, मधुकर जांभळे, प्रकाश आंबी, मारुती गावडे, ठेकेदार कानकेकर (कनिष्क इंजिनीरिंग) ठेकेदार सतीश मोहिते व एमएसईबीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच कागल नगरपरिषदेचे बापूसाहेब घाटगे, मोरे या सर्वांच्या प्रयत्नाने व सहकार्यामुळे पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेच्या कार्यास आज यश मिळालेले आहे.
सदरचे पाणी कणेरी जलशूद्धीकरण केंद्रामध्ये पोहचल्यानंतर तेथे पाणी शुद्धीकरणानंतर,सदरचे शुद्ध पाणी उजळाईवाडी टेकडीवरील मुख्यसंतुलन पाण्याच्या टाकीमध्ये उद्या पहाटे पर्यंत उशिरा पोहचेल. त्यानंतर नेहमीच्या रोटेशन पद्धतीने उद्या दि.28-07-2021 रोजी या प्रादेशिक योजने अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावांना रोटेशन पद्धतीने सुरु होईल यात वळिवडे, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, उचगांव, पाचगांव, मोरेवाडी, गोकुळशिरगांव, सरनोबतवाडी, कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली-तामगांव मधील एम.आय.डी.सी. मधील संलग्न भाग, के.आय.टी. कॉलेज, अथायू हॉस्पिटल, शांतीनगर, मणेरमळा, या सर्व भागातील पाणी पुरवठा सुरु होईल.