रांची / वृत्तसंस्था
झारखंडच्या धनबादमध्ये खाण कोसळून शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. अवैध उत्खनन सुरू असताना सुमारे 25 ते 30 लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना धनबादच्या निरसा भागात घडली असून ईसीएल मुग्मा क्षेत्रांतर्गत कापासारा आउटसोर्सिंगमध्ये ही मोठी दुर्घटना घडली. अवैध उत्खनन सुरू असताना अचानक खाणीचा काही भाग कोसळल्याने लोक गाडले गेल्याचे सांगितले जात आहे. गाडले गेलेले मजूर स्थानिक नसून ते पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात आले. बंगालमधील आसनसोल येथून मोठय़ा पैशांचे आमिष दाखवून त्यांना खाणीच्या कामात गोवण्यात आले होते.