टेकडय़ावरील घरात राहण्याची अगतिकता, पालिकेकडून दरडीपासून सावध राहण्यास सांगितलेल्या दरवर्षीच्या सूचनांचा सोपस्कार, वस्तीसाठी पाणी वीज मिळवून देणारे प्रशासन आणि मतपेटय़ा शाबूत राहाव्यात म्हणून काहीही कर्तव्य न करणारे राजकीय पक्ष…. हे सर्व कोरडेपणाने सुरु असेपर्यंत दर पावसाळ्यात दरडींखाली चिरडून जाणारे शेकडो निष्पाप जीव कोण वाचवणार?
पावसाळा आला की धोकादायक टेकडय़ांवर राहणारे नागरिक जीव मुठीत धरून जगत असतात. मुंबईतील डोंगर वजा टेकडी कधी खचेल याचा अंदाज नसल्याने तिथे राहणारा प्रत्येक रहिवाशी दहशतीखाली असतो. शनिवारी मुंबईत रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला. त्यातून पूर्व उपनगरात 4 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 7 ठिकाणच्या वस्त्यांवर दरडी कोसळल्या. तर इतर ठिकाणी संरक्षक भिंती आणि घरांच्या भिंती कोसळल्या. यातून 31 जण जीवाला मुकले. एका रात्रीचा जोरदार पाऊस मुंबईतील जमिनीला न पेलणारा होता. त्यामुळे माती-दगडाचे ढिगारे वस्त्यांवर कोसळले. या पावसाचा अंदाज दिला असला तरीही मुंबईतील जमिनीवर होणाऱया परिणामाची पुसटशी कल्पना कोणालाही नव्हती.
पावसाळ्यापूर्वी मुंबई पालिका प्रशासनाकडून या वस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र ही प्रक्रिया एवढय़ा कोरडेपणाने दिली जाते की, दरडीलगत वस्त्यांना ती अंगवळणी पडलेली आहे. यातील गांभीर्य जीव गेल्यावर उमगू लागते. प्रशासन आणि रहिवाशी दोन्ही घटक दरड कोसळण्याच्या घटनेला हलक्यात घेत असतात. जीवित हानी झाल्यावर टीका केली जाते. मात्र ही टीका सुद्धा जीवितहानी झालेल्या प्रसंगाचे गांभीर्य संपेपर्यंतच केली जाते. त्यानंतर पुढील पावसाळ्यात दुसरी दरड कोसळून जीव जात नाही तोपर्यंत ना प्रशासकीय पातळीवर बोलले जाते, ना वस्त्यांतील रहिवाशी बोलत. पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडून मदत निधी जाहीर झाल्यावर पडदा पडतो. मुंबईत पावसाच्या पुराचे पाणी जसे सखल वस्त्यांमध्ये शिरते तसें डोंगर टेकडय़ांवरूनदेखील वाहात असते. मुंबईत टेकडय़ांवरील वस्त्यांसाठी काही धोकादायक परिसर पालिकेने हेरून ठेवले आहेत. यात विक्रोळी पार्कसाइट, साकीनाका, कुर्ला, घाटकोपर, चांदिवली, भांडुप, चेंबूर, मालाड, बोरिवली, गोरेगाव आदी दरडी कोसळण्याची मुख्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षात दरडी कोसळून अनेक जीव मातीच्या ढिगाऱयाने गिळंकृत केले आहेत. दरड कोसळण्याच्या घटना दर वर्षीच्या पावसात होत असतात. तरीही नाईलाजास्तव रहिवाशी या ठिकाणी राहत आले आहेत. ही अगतिकताच त्यांचे बळी घेत असते. तर पालिका नोटीसा बजावण्याव्यतिरिक्त काही करत नसल्याचे येथील रहिवाशी तक्रार करतात. मुंबईतील मुसळधार पाऊस येथील टेकडय़ांवरील घरांना घातक ठरत असतो.
मुंबईतील काही टेकडय़ावर मातीची खोली अधिक आहे तर काही टेकडय़ांवर दगड असल्याचे सेंटर फॉर सिटीजन सायन्स संस्थेचा सतर्क उपक्रमातील अभ्यासक सांगतात. मुंबईतील काही टेकडय़ांवर मातीची खोली अधिक आहे तर काही ठिकाणी खडक आहेत. कमी कालावधीत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यास अशी भूस्थिती असलेल्या ठिकाणावरील वाहते पावसाचे पाणी माती किंवा दगड वेगळे करू लागते. त्यातून मातीचे ढिगारे कोसळू शकतात. पालघरपासून गोव्यापर्यंतच्या पूर्ण किनारपट्टीत माती एक प्रकारचीच आहे, मात्र ज्या ठिकाणी मातीची खोली अधिक असते. त्या ठिकाणी पावसाचे पाणी झिरपून दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते असे ‘सतर्क’च्या अभ्यासकानी सांगितले. दोन दिवसापूर्वी घडलेल्या दरड कोसळण्याच्या ठिकाणावरील माती याच प्रकारातील असावी असा अंदाज आहे. पावसाचे पाणी मुरल्यास माती निघू लागते तर खडक असलेल्या ठिकाणी खडकावरील माती वाहून गेली की खडक मोकळा होऊन दरड कोसळते. मुरलेल्या पाण्याचा दाब तयार झाला की माती निखळू लागते. सेंटर फॉर सिटीजन सायन्स संस्थेचा ‘सतर्क’ हा उपक्रम दरड कोसळण्याचा इशारा देण्याचे काम करतो. दगडाचा आणि मातीच्या प्रकाराचा अभ्यास करून इशारा दिला जात असल्याचे उपक्रमातील तज्ञ सांगतात. दरड कोसळण्याची दुर्घटना बहुतांश मानवनिर्मित असते. नैसर्गिक दरड कोसळण्याची घटना क्वचित घडत असते. त्यामुळे एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर रस्ता किंवा बांधकाम करताना उताराची रचना करून करण्याचे सूचित करण्यात येत आहे. उतारामुळे तीव्रता कमी होऊन दरड कोसळण्याच्या घटना कमी होऊ शकतात. मुंबईतील घाटकोपर, भांडुप, साकीनाका खाडी क्रमांक तीनच्या भागात गेल्या काही वर्षांत दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई पूर्व-पश्चिम आणि शहर भागातील टेकडय़ावरील हजारो रहिवाशी पावसाळा आला की जीवमुठीत धरून जगात असतात. दरडींच्या काही धोकादायक ठिकाणांवर संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र हे भिंती उभारण्याचे किंवा दुरुस्तीचे काम यावरून देखील प्रशासनामध्ये वाद आहेत. यात एमएमआरडीए आणि पालिका यांच्यात समन्वयाची गरज आहे. यापूर्वी काही हजार मिटर उभारलेल्या भिंतीची सद्यस्थिती काय आहे याची माहिती दोन्ही प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे किंवा नव्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावयाची असल्यास ती माहिती राज्य सरकारला देखील हवी. अशा शेकडो ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत असते, मात्र ते आश्वासन पूर्ण होताना दिसून येत नाही. एखाद्या ठिकाणी दरड कोसळल्या नंतर दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हा प्रश्न वर्षानुवर्षे सलत आहे.
रहिवाशांची अगतिकता, दरडीपासून सावध राहण्याचा इशारा-सूचनांचे प्रशासकीय सोपस्कार, मतपेटय़ा जपणारे राजकीय पक्ष या सर्व कोडगेपणातून पावसाळ्यात मुंबईतील दरडींखाली चिरडून जाणारे निष्पाप जीव कोण वाचवणार हा खरा प्रश्न आहे.
राम खांदारे