भोगावती/प्रतिनिधी
भोगावती ते कोल्हापूर मार्गावरील नवीन रस्त्याचे काम खासदार,दोन्ही आमदार,जिल्हा परिषद सदस्यांनी येत्या दोन महिन्यात पूर्ण करून घ्यावे अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू,वेळप्रसंगी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या निषेधाचे फलक याच रस्त्यावरील खड्यात लावू. या रस्त्याच्या डांबरात अनेकांचे हात काळे झाले आहेत. त्यामुळेच रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालंदर पाटील यांनी सोमवारी भोगावती येथे केला.
भोगावती ते कोल्हापूर पर्यंतच्या राज्य मार्गाच्या नवीन कामामुळे झालेल्या दयनीय अवस्थेला व रेंगाळलेल्या कामाच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, भागातील सर्व व्यापारी संघटना,प्रवाशी व तरुण मंडळांच्यावतीने ठिकपुर्ली फाटा परिते भोगावती येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या व्यापक जनआंदोलनात ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले की,विभागाचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांना निवेदन दिले असता तुमच्या संघटनेने पाठिंबा दिलेल्या भाजप सरकारचे हे काम आहे असे त्यांनी सांगितले.मात्र चुकीची कामे केली म्हणूनच आम्ही त्यांचे सरकार पाडले.आता तुम्ही स्वाभिमानीच्या पाठिंब्यावर निवडून आलात.आता हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे.अशी सुचना करून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.
स्वाभिमानी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, राधानगरी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष एकनाथ चौगले, राधानगरी तालुका स्वाभिमानीचे अध्यक्ष अण्णाप्पा चौगले यांची भाषणे झाली. या आंदोलनात परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी दहा पासून दोन तास राज्य मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.तरीही रस्त्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.यामध्ये परितेच्या सरपंच आक्काताई कारंडे,उपसरपंच अजित पाटील,शेतकरी संघटनेचे आनंदराव पाटील,विलास पाटील,रावसाहेब डोंगळे,सातापा नरके,व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवासी व युवक मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले होते.