आसाम काँग्रेसची मागणी
काँग्रेसने 6 एप्रिल रोजी आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात तमुलपूर मतदारसंघातील मतदान स्थगित करण्याची मागणी केली आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचा घटक पक्ष असलेल्या बोडोलँड पीपल्स प्रंटचा उमेदवार रंगजा खुंगुर बासुमतरी हेच भाजपमध्ये सामील झाले आहेत.
निवडणूक आयोगाने या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी संजीव शर्मा यांच्या उपस्थितीत शनिवारी याप्रकरणी सुनावणी केली आहे, पण अद्याप कुठल्याही निर्णयाची घोषणा करण्यात आलेली नाही. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रातील बक्सा जिल्हय़ात येणाऱया तमुलपूर विधानसभा मतदारसंघातील स्वतःचा उमेदवार भाजपमध्ये सामील झाल्यावर बीपीएफने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती.
बासुमतरी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे केली आहे. तसेच आसामचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते हेमंत विश्व शर्मा यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचीही विनंतीही त्यांनी केली आहे. शर्मा यांनी बीपीएफ उमेदवार भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी त्याच्यासोबत चर्चा केली होती.
आदर्श आचार संहितेसह लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये अनेक तरतुदींचे घोर उल्लंघन करणारा हा प्रकार असल्याचे स्पष्ट आहे. अशा स्थितीत बासुमतरी आणि शर्मा यांच्या विरोधात योग्य आणि आवश्यक कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच तमुलपूर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया त्वरित रोखण्यात यावी अशी विनंती करत असल्याचे बोरा यांनी म्हटले आहे.