शिरीष कामत यांची याचना यापुर्वी राज्यपालांकडे केली होती तक्रार
प्रतिनिधी / पणजी
माजी मुख्यमंत्री, तथा विद्यमान विरोधी पक्षनेते, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचना करून सां जुझे दी आरियाल येथील शिरीष कामत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली असून निवडणूक आयोगासह गोव्याच्या राज्यपालांनाही प्रतिवादी बनवण्यात आले आहे.
दिगंबर कामत यांना आमदार म्हणून अपात्र करावे, अशी मागणी करून शिरीष कामत यांनी 28 एप्रिल 2017 रोजी तक्रार केली होती. सदर तक्रारीवर राज्यपालांनी दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी निवाडा दिला आणि याचिकादाराची तक्रार फेटाळली. राज्यपालांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून निवाडा दिला. त्यामुळे आता राज्यपालांना प्रतिवादी करुन ही याचिका सादर झाली आहे.
दिगंबर कामत अपात्र का ठरतात?
शिरीष कामत यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्याप्रमाणे जी कंपनी किंवा आस्थापन सरकारी कंत्राट घेते, सरकारला देणे लागते अथवा सरकारच्या मर्जीवर, अनुदानावर चालते, सरकारच्या मेहरबानीवर चालणाऱया आस्थापनाच्या संचालकाला सरकार चालवणारा सदस्य म्हणजे आमदार बनता येत नाही. राज्यपालांनी दिलेला निवाडा योग्य नसल्याचे कारण दाखवून सदर याचिका आता खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे.
भारत कन्स्ट्रक्शनमध्ये कामत होते भागीदार
मेसर्स भारत कन्स्ट्रक्शन या पार्टनरशीप फर्मची स्थापना 1980 मध्ये झाली त्यावेळी दिगंबर कामत त्यात एक भागिदार होते. त्यानंतर 1989 साली त्यांनी आपल्याजागी पत्नी आशा दिगंबर कामत यांची नियुक्ती केली. या आस्थापनाने गोवा जलसिंचन खाते आताचे सलस्रोत खात्याची अनेक कंत्राटे घेतल्याचे उघड झाले आहे.
दोन कंपन्यांकडे सरकारची करोडो रुपयांची कामे
दिगंबर कामत 1994 साली आमदार बनले तेव्हा त्यांनी सदर कंपनीतून निवृत्ती घेऊन आपल्या पत्नीची नियुक्ती केली. त्यांच्या दोन कंपन्यांकडे सरकारची करोडो रुपयांची कामे होती. 1999 मध्ये ते परत निवडून आले तेव्हाही सरकारी कामे त्यांच्या कंपनीकडे होती. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्यावेळी तसाच प्रकार होता, 2006 मध्ये अपोलो इंजिनियर्स ऍण्ड कॉन्ट्रक्टर्स प्रा. लि. हे आस्थापन स्थापण्यात आले. त्यात मेहुण्याला भागिदार करून घेऊन सरकारी कामे या नव्या कंपनीला मिळू लागली. त्यामुळे दिगंबर कामत अपात्र झाले पाहिजेत, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.
पुढील सुनावणी दि. 17 फेब्रुवारी रोजी
राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडून लेखी सल्ला मागितला. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून राज्यपालांनी सदर तक्रार अर्ज वजा याचिका फेटाळली होती. आता त्याला खंडपीठासमोर आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी ठेवण्यात आली आहे.
आपल्याला न्याय मिळणारच : शिरीष कामत
दिगंबर कामत अपात्र ठरलेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया शिरीष कामत यांनी व्यक्त केली आहे. सां जुझे दी आरियाल पंचायतीतील एक महिला पंच अपात्र ठरली, कारण तिचा पती सरकारी कंत्राटदार होता. तोच नियम दिगंबर कामत यांनाही लागू होतो. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास असून आपल्याला न्याय मिळणारच असल्याचे म्हणाले.
न्यायदेवता योग्य तोच निवाडा देईल : दिगंबर कामत
याचिका न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आपण कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. आपला वकील न्यायालयात योग्य उत्तर देईल, असे मत दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. सदर याचिकादाराने यापूर्वी 3 वेळा निवडणूक आयोगाकडे आणि राज्यपालांकडे केलेली तक्रार फेटाळण्यात आली आहे. आता पाच वर्षाचा कालावधी उलटून विधानसभा निवडणूक नव्याने होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे या प्रश्नावर अधिक भाष्य न केलेलेच बरे, देव आणि न्यायदेवता आपल्याला योग्य तोच निवाडा देईल, असे ते म्हणाले.