वार्ताहर/ वाठार किरोली
कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावाने पाणी शुद्धीकरणाची पारंपरिक पद्धत असणाया ’टीसीएल’ पावडरचा वापर पूर्णपणे बंद करून त्याच्याऐवजी ’क्लोरीन गॅस’च्या माध्यमातून संपूर्ण गावाला शंभर टक्के शुद्ध आणि स्वच्छ पाणी देणे सुरू केले आहे. अशा प्रकारे शुद्ध पाणी पुरवठा करणारी नागझरी ग्रामपंचायत राज्यात पहिली ठरली आहे. यासाठी गावाने स्वत:च निधी उपलब्ध केला असून गेल्या आठ दिवसांपासून ही योजनाही कार्यान्वित झाली आहे. विशेष म्हणजे सरपंच परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रत्येक गावात पाणी शुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने काम सुरू केले आहे. सातारा जिल्हा परिषदेने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
राज्यातील बहुतांशी पाणी पुरवठा योजनांमध्ये ’टीसीएल’चा वापर करूनच शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मोठय़ा पाणी योजना आहेत तिथे अपवादात्मक ठिकाणीच ’क्लोरीन गॅस’चा वापर करून पाणी पुरवठा केला जात आहे. ’टीसीएल’च्या माध्यमातून पाणी शुध्दीकरण नित्याचेच आहे. मात्र, याच्या कमी-अधिक वापरामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ’टीसीएल’मुळे मुतखडा, कावीळ, पोटाचे विकार कायमचेच असतात, तर दुसरीकडे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अनेकदा खराब होण्याचा धोका असतो. त्यावर विचार करून नागझरीचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र भोसले यांनी गावात ’टीसीएल’चा वापर पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर काम सुरू केले. गावानेही त्याला एकमुखी पाठिंबा दिला.
आठ दिवसांपूर्वी ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि नागझरी येथे ’क्लोरीन गॅस’च्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत असून गावातील पहिल्या नळाला ज्या स्वच्छ प्रतीचे पाणी येते त्याच प्रतीचे पाणी गावातील शेवटच्या नळाला येते. ’क्लोरीन गॅस’च्या वापरामुळे पाणी पुरवठा करणारी टाकी आणि विहिरीतील शैवालही आता दिसेनासे झाले आहेत. विशेष म्हणजे विहिरीतील पाणी इतके स्वच्छ, शुद्ध आणि पारदर्शक दिसत आहे की काठावरून पाहिले तरी विहिरीचा तळ दिसत आहे.
दरम्यान, नागझरी गावाने लोकसहभाग आणि शासनाच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात केली आहेत. गावओढय़ात पंचवीस गॅबियन बंधारे बांधले. परिणामी ओढा बारमाही पाणीदार झाला. पंचवीस नवीन सिमेंट बंधारे तर तीसहून अधिक शेततळी झाली. दोन हजार एकरवर डीपसीसीटी तर बाराशे एकर क्षेत्रावर कम्पार्टमेंट बंडींग झाले. सव्वाशे मातीचे नालाबांध तयार करण्यात आले. चार पाझर तलावांचीही दुरुस्ती करुन त्यामध्ये कागदही टाकण्यात आला. याकामी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. योगेश सागर, भारतीय जैन संघटना, भारत फोर्ज त्याचबरोबर पानी फौंडेशनच्या माध्यमातून आमीर खानचे मोठे सहकार्य मिळाले.
ङनागझरीकारांचे कामच जरा हटके..!ङ
कोरेव तालुक्यातील नागझरी येथील क्रमांक एकच्या तलावातून सलग तीन वर्षे लोकसहभागातून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचवीस हजार ब्रास गाळ शेतकयांनी आपल्या शेतीसाठी वापरला. परिणामी पडीक जमीन पिकाखाली आणि अर्थकारणाची नवीन वाट मिळाली. वरुणराजाच्या कृपेने हा तलाव भरल्यामुळे आर्वी, वाठार, पिंपरी, साठेवाडी, कोंबडवाडी, किरोली गावाचा काही भाग, तसेच डोंगरापलीकडे असणाया कराड तालुक्यातील काही गावांना त्याचा फायदा होण्यास मदत झाली. लोकसहभाग आणि श्रमदानाची वाट चोखाळली तर दुष्काळावर मात करता येऊ शकते, हे सातारा जिह्यातील अनेक गावांनी दाखवून दिले. त्याला नागझरी गावसुध्दा अपवाद नाही. दरम्यान नागझरी गावाने केलेले काम पाहून प्रख्यात चित्रपट अभिनेते आमीर खानही भारावून गेले होते.