प्रतिनिधी/फोंडा
फोंडा पालिकेच्या एकूण पाच नगरसेवकांनी गेल्या तीन महिन्यात भाजपात प्रवेश केला असून मोठय़ा संख्येने युवा कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदार संघात कमळ निश्चितच फुलणार, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. फोंडा पालिकेच्या प्रभाग 2 मधील नगरसेवक विरेंद्र ढवळीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. या प्रवेश सोहळय़ाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
तीन महिन्यात पाच नगसेवक भाजपात
विरेंद्र ढवळीकर हे मगो पक्षाच्या रायझिंग फोंडा या गटातून फोंडा पालिकेवर निवडून आले होते. मगो पक्षाच्याच यतीश सावकार यांनी गेल्या आठवडय़ात तर त्यापूर्वी काँग्रेसचे रितेश रवी नाईक, आनंद नाईक व विलीयम आगियार या तिघा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. फोंडय़ात भाजपाची ताकद वाढत असल्याचे हे संकेत असून येत्या 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदार संघात भाजपाचा झेंडा निश्चितच फडकणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले. राज्य सरकारने सुरु केलेला ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय’ हा उपक्रम फोंडा पालिका क्षेत्रातही राबविणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाला राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणिस ऍड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, फोंडा भाजपाचे अध्यक्ष व नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, विलियम आगियार, यतीश सावकार, विरेंद्र ढवळीकर, अर्चना डांगी, भाजपाचे पदाधिकारी सुनिल देसाई, यशवंत खेडेकर, कुर्टीच्या सरपंच श्रवणी गावडे, जिल्हा पंचायत उमेदवार संजना नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फोंडा पालिकेवर भाजपा बहुमतात : दळवी
विरेंद्र ढवळीकर यांचा भाजपा प्रवेश म्हणजे त्यांनी योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असल्याचे विनय तेंडुलकर म्हणाले. विरेंद्र यांच्या भाजपा प्रवेशाने फोंडा पालिकेवर भाजपाने बहुमत गाठल्याचे विश्वनाथ दळवी यांनी सांगितले. फोंडय़ाच्या विकासाच्यादृष्टीने पक्षाला ही स्थिरता व बहुमत आवश्यक होते. येणाऱया काळात अजून विविध पक्षातील बरेच कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असून पक्षासाठी हे शुभसंकेत असल्याचे ते म्हणाले.
आपण स्वेच्छेने व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे विरेंद्र ढवळीकर यांनी सांगितले. आपल्या प्रभागातील रखडलेली विकासकामे मार्गी लागावीत व अधिक चांगला विकास करता यावा शुद्ध हेतूनेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. शांताराम कोलवेकर यांनी स्वागत तर दिगंबर जल्मी यांनी सूचसंचालन केले. यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.