प्रतिनिधी /म्हापसा
माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा पक्ष आपली तत्वे बाजूला ठेवून तृणमूल पक्षाशी युती करतो, याबद्दल व्यक्तीशः वाईट वाटते, असे मत माजी मंत्री तथा शिवोली येथील भाजपचे वरिष्ठ नेते दयानंद मांद्रेकर यांनी ‘तरुण भारत’शी व्यक्त केले.
2017 साली निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत नव्हते. विधानसभा व निवडणूक हे एक नाटक आहे. त्यावेळी गोवा फॉरवर्ड विरोधक होता. विजय सरदेसाई सदैव भाजप सरकारला ‘यूटर्न सरकार’ अशी टीका करत. आपण निवडणून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा देणार हे त्यांचे आश्वासन लोकांनी एकले. तेथे काँग्रेस उमेदवार नव्हता. लोकांनी त्यांना कौल दिला. भाजपने सरकार बनवले, यात आश्चर्य नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांनी सरकार घडविले, असे मांद्रेकर यावेळी म्हणाले. रवी नाईक ही बाहेर पडले, येणाऱया काळात विनोद पालयेकरांना भाजप पक्षात घेतले तर आपल्यावर त्याचा काडीमात्र परिणाम होणार नाही. आम्ही शून्यातून हा पक्ष वर आणला आहे. आमदार म्हणून काम केले. गेली 10 वर्षे सरकार सत्तेवर आहे. पुढे पाच वर्षांतही भाजप सत्तेवर असणार, असा दावा दयानंद मांद्रेकर यांनी केला.