प्रतिनिधी / सातारा
रंजल्या गांजल्या तेथेची देव जाणावा, त्यांना आपुले म्हणावे या उक्तीप्रमाणे प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ यांचे कार्य आहे. त्यांच्या विचारानुसार राज्यात प्रहारचे काम सुरू आहे. अंध, निराधार, दिव्यांग व गरिबांच्या मदतीला मानवतेच्या भावनेतून धावून जाणे हाच धर्म आहे. दि.29रोजी विवाह झालेल्या अंध माहेश्वरीला परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही परंतु आता तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्रहार जनशक्तीचे शंभूराज खलाटे यांनी आपण घेतली असल्याचे सांगितले.
फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील अंध माहेश्वरीच्या कुटूंबियांची गरिबीमुळे अगोदरच वाताहत झाली आहे. त्यातच पावसाने घरातील साहित्य अन तिच्या लग्नाचे साहित्य वाहून गेले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिचे शिक्षण थांबवले. दि. 29 रोजी तिचा विवाह झाला. विवाहाची बातमी ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच प्रहार जनशक्तीचे शंभूराज खलाटे यांनी ‘तरुण भारत’चे अभिनंदन करत त्या माहेश्वरीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत असे सांगितले. त्यामुळे मंत्री बच्चूभाऊ यांच्याप्रमाणेच त्यांचे ही कार्यकर्ते काम करत असल्याचा प्रत्यय आला.