वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात असून राजकीय डावपेचांचीही चलती सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान मोदींना आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोध असून आपण पंतप्रधान मोदींचे ‘हनुमान’ आहोत, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र हा त्यांच्या डावपेचाचा भाग असून भाजप-संजद युतीत गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपने केली. राज्यात भाजप-संजद युती अभेध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. चिराग पासवान ‘व्होट कटवा’ असल्याचा आरोप करण्यात आला.