माजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांचे आव्हान
प्रतिनिधी / पणजी
म्हादईचे अस्तित्व राखण्यात गोव्यातील भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा आणि म्हादईच्या रक्षणासाठी रस्त्यावर येऊन लढा द्यावा. आम्हीही त्यांच्यासोबत रस्त्यावर यायला तयार असल्याचे माजी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकार गोव्याला काडीचीही किंमत द्यायला तयार नाही हे आता स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हादईसाठी आपल्यासाठी आईपेक्षाही मोठी असल्याचे विधान वेळोवेळी करीत आले आहेत. पण आईपेक्षा मोठय़ा असलेल्या म्हादईचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. म्हादईचे अस्तित्वही राखणे मुख्यमंत्र्यांना शक्य झालेले नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री व गोवा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही पालयेकर यांनी केली.
गोव्याच्या भावना केंद्राला कळवायला हव्या
म्हादईबाबत गोमंतकीयांच्या भावना केंद्र सरकारपर्यत पोचविण्याची गरज आहे. त्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारला गोव्याबाबत काही पडलेलेच नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी पाठविलेल्या पत्रात गोव्याला काही महत्वच त्यांनी दिलेले नाही, हे स्पष्ट होत आहे. गोव्यातील जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोचायला हव्या, कारण म्हादई गोव्याच्या हातातून जवळजवळ गेलेली आहे, असेही पालयेकर म्हणाले.
केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा जाहीर निषेध
केंद्र सरकारची भूमिका पाहिल्यास केंद्राने कर्नाटकला झुकते माप दिल्याचे स्पष्ट होत आहे. म्हादई त्यांनी पूर्णपणे कर्नाटकला बहाल केली आहे. असाच त्याचा अर्थ होतो, असेही ते म्हणाले. तसेच गोव्याच्या भावना पायदळी तुडविणाऱया केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचा आपण जाहीर निषेध करीत असल्याचेही पालयेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे हाच पर्याय
कर्नाटक हे मोठे राज्य असल्याने राजकीयदृष्टय़ा विचार करून कर्नाटकला झुकते माप दिले आहे. म्हादईबाबत कोणताही निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते हेच केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून गोव्याला आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार किती महत्व देते हे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावर येणे हाच पर्याय आता शिल्लक आहे.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रालाही किमत नाही
आपण जलस्रोत खात्याचा मंत्री असताना गोवा फॉरवर्डने म्हादईचा हा संवेदनशील विषय योग्य पद्धतीने हाताळला. ज्यावेळी म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविल्याची माहिती मिळाली त्यावेळी कर्नाटकात आपण स्वतः जाऊन पाहणी केली. त्यावेळी परिस्थिती अत्यंत स्फोटक, असतानाही तिथल्या जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून मशिनरी तिथून हलविल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही एक पत्र येडियुरप्पा यांना दिले होते. त्या पत्राला कोणतीही किमत नाही, असेही आपण स्पष्ट केले होते, असेही पालयेकर म्हणाले.
हणजूण पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे
अमलीपदार्थाबाबत आपण ठाम भूमिका घेतली होती. कोरोना काळात ड्रग्जच्या पाटर्य़ा होतात ते धोकादायक आहे. या प्रकरणी हणजुणे पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांविरोधात कारवाई व्हायला हवी. त्याला त्वरित निलंबित करायला हवे. कारण अशा पद्धतीने ड्रग्जच्या खुलेआम पाटर्य़ा चालतात याला तेच जबाबदार आहेत, असेही पालयेकर यांनी सांगितले.