सर्वांची ओळख, चर्चा होण्याच्या दृष्टीने राजकारणविरहित कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील नवनिर्वाचित आमदारांची ओळख व परिचय होण्याच्या दृष्टीने राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना चहपानासाठी राजभवनावर पाचारण केले होते. तथापि 40 आमदारांपैकी फक्त 28 जणांनीच तेथे उपस्थिती लावली. तर 12 आमदारांनी या कार्यक्रमावर पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. त्यात सत्ताधारी पक्षीय आमदार-मंत्री यांचाही समावेश आहे.
राज्यपाल पिल्लई व त्यांची पत्नी रिटा पिल्लई यांनी राजकीय पक्षविरहित सर्व आमदारांना एकत्र आणण्यासाठी चहापानासाठी निमंत्रित केले. राज्यपालांशी सर्वांची ओळख, चर्चा चर्चा व्हावी, असा त्यामागील हेतू होता. सर्वांनी राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन काम करावे हे लोकशाहीत महत्त्वाचे आहे. म्हणूनच राज्यपालांनी सर्वांना अगत्याने बोलावून त्यांचे अभिनंदन केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदारांनी देखील राज्यापालांच्या या कृतीचे कौतुक केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, व इतर काही मंत्री आमदार उपस्थित होते. तथापि दिगंबर कामत यांच्यासह 12 आमदारांनी मात्र राज्यपालांना प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले.