वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 322 जणांचे जंबो पथक जाहीर पेले असून त्यात 215 क्रीडापटू आणि 107 पदाधिकारी व सहायक स्टाफचा समावेश आहे.
28 जुलैपासून या स्पर्धेची सुरुवात होणार असून 8 ऑगस्टला त्याचा समारोप होईल. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीत सुधारणा करण्यासाठी भारताचे प्रयत्न असतील. त्या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतर तिसरे स्थान मिळविले होते. ‘आम्ही या स्पर्धेसाठी बलाढय़ पथक पाठवले असून आमचे बलस्थान असलेल्या नेमबाजीचा या स्पर्धेत समावेश नसला तरी मागील आवृत्तीतील कामगिरीपेक्षा सरस प्रदर्शन आपले खेळाडू यावेळी करतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. जागतिक दर्जाची ही स्पर्धा असल्याने आपल्या खेळाडूंनी त्याची उत्तम तयारी केली आहे,’ असे आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले.
या स्पर्धेसाठी भारतीय पथक पाच विविध ठिकाणी वास्तव्य करणार असून महिला क्रिकेट संघाला स्वतंत्रपणे बर्मिंगहम सिटी सेंटर येथे ठेवण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या पथकात नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मिराबाई चानू, लवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया, रविकुमार दाहिया, मनिका बात्रा, विनेश फोगट, तजिंदरपाल सिंग तूर, हिमा दास, अमित पांघल या काही नामवंतांचा समावेश आहे. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजेश भंडारी या पथकाचे प्रमुख असतील.
भारतीय पथक या स्पर्धेत 15 क्रीडा प्रकार व चार पॅरा स्पोर्ट्स प्रकारात भाग घेणार आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टिंग, महिला क्रिकेट, कुस्ती या प्रकारात भारताला पदकांची अपेक्षा आहे. याशिवाय ऍथलेटिक्स, सायकलिंग, जलतरण, टेबलटेनिस या प्रकारातही भारताला पदकाच्या आशा आहेत. पथकातील बरेच सदस्य बर्मिंगहमला पोहोचले असून काही खेळाडू इतर देशातील स्पर्धांत खेळत आहेत. तेथूनच ते थेट स्पर्धा ठिकाणी दाखल होतील. उर्वरित पथक दिल्लीहून प्रयाण करणार आहे. 23 जुलैला राष्ट्रकुल क्रीडाग्राम खेळाडूंसाठी खुले करण्यात येणार आहे.