प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रेल्वे वाहतुक बंद करण्यात आली होती. मे महिन्याच्या अखेरीपासुन काही प्रमाणात रेल्वे वाहतुक सुरू करण्यात आली असली तरी अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. रेल्वे प्रवासी संख्या रोडावल्याचा फटका रेल्वे सोबतच कुली काम करणाऱयांना बसला आहे. कुली व्यवसाय बंद असल्याने त्यांना आता इतर व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. दिल्ली पासून एर्नाकुलम पर्यंतच्या लांब पल्ल्याच्या व पॅसेंजर रेल्वे बेळगाववरून धावतात. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री तसेच एअरमन टेनिंग स्कूल असल्यामुळे जवानांचीही ये-जा असते. या प्रवाशांचे ओझे वाहुन नेण्यासाठी कुली कामगार आहेत. बेळगावमध्ये 13 जण अधिकृत कुली कामगार आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांना काम उपलब्ध नाही. अनेकांनी मागील 7 ते 8 महिन्यापासून घरीच राहणे पसंत केले आहे. कोणी गवंडी काम तर कोणी शेती करताना दिसत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास पुन्हा पुर्वपदावर यावा अशी मागणी या कुली कामगारांकडून केली जात आहे.
देवराई कोणू, (कुली कामगार)
मागील 50 वर्षांपासुन या बेळगाव रेल्वे स्थानकावर कुली काम करीत आहे. यामुळे अनेक प्रवाशांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. परंतु लॉकडाऊनपासून प्रवासीच नसल्याने आमच्यावर वाईट वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.