ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष ट्रेन्स वगळता सर्व लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे वृत्त सोशल मीडियावर झळकत होते. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिसूचना काढलेली नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या आजच्या (11 ऑगस्ट) एका पत्राचा हवाला देत सोशल मीडियाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून 30 सप्टेंबरपर्यंत लोकल सेवा, एक्सप्रेस आणि मेल बंद राहणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केलेे. त्यात तिकीट रद्द करण्यास मुदतवाढ दिली असली तरी विशेष मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स या वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहेत. त्याचसोबत मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत असलेल्या मर्यादित लोकलही सुरु राहतील, असे सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटले आहे की, रेल्वेने आज जारी केलेल्या पत्रात विशेष ट्रेन्स वगळता पुढील आदेश येईपर्यंत सर्व ट्रेन्स बंद राहतील, असे म्हटले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स बंद राहतील, असे कुठेही म्हटले नाही.