मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : पर्रीकर यांच्या काळातच महिला सबलीकरण.राष्ट्रीय महिला संसदेचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
गोवा हे एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. ‘सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रसी’चा एक भाग म्हणून संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. जर गोव्यात दर दोन वर्षांनी एकदा गोवा विधानसभेत आयोजित करण्यात आले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. विविध योजना, महिला समस्या, कॉर्पोरेट क्षेत्र, सरकारी क्षेत्रातील चर्चा होणे आवश्यक आहे. गोवा स्वयंपूर्ण होत आहे आणि लवकरच गोवा स्वयंपूर्ण होणार. सर्वांनी सहकार्य केले तर 60व्या गोवा मुक्तीदिनानिमित्त 19 डिसेंबर रोजी गोवा नक्कीच स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गोव्यात लवकरच गोवा सरकारतर्फे लोकशाही उत्सव आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.
दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ‘सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रसी’चा एक भाग म्हणून एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते.
स्मृती इराणी ऑनलाईनपद्धतीने मार्गदर्शन करतील
जरी या संसदला 95 टक्के गोमंतकीय असले तरी अरूणाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात व इतर भागातून महिला सदस्य आले आहेत. सदर कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार होत्या. परंतु वैयक्तिक कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. परंतु पुढील दोन दिवसात त्या ऑनलाईन पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपले नावलौकिक मिळवित आहेत. येत्या काळात महिला राजकीय क्षेत्रातही पुढे येतील. राज्य सरकार महिलांना विविध संधी व व्यासपीठ देत आहेत. पंचायत, जिल्हा पंचायत क्षेत्रात त्यांना आरक्षण दिले जाते. पाच दिवसांचा लोकशाही उत्सव महिला, युवा आणि पंचायत स्तरावरील संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येकांनी सहभागी व्हावे. 18 ते 35 वर्षातील युवांनी युवा संसदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महिलांसाठी गोवा सरकार कार्य करीत आहे. गोव्यात महिला सबलीकरण झाले ते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात झाले. गृहआधार योजना, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू करून महिलांना आधार देण्याचे काम पर्रीकरांनी केले. शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून गोमंतकीयांनी ताकद दाखविली.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, मार्जी ऊर्जामंत्री निर्मला सावंत, आमदार चर्चिल आलेमाव, मुख्य सचिव परिमल रॉय, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, यूथ पार्लेमेंटचे संस्थापक राहुल कराड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय उपस्थित मान्यवरांच्याहस्ते परिषदेचा घंटानाद करण्यात आला.
महिला संसद गरजेची : श्रीपाद नाईक
लोकशाहीने भारताला मोठे स्थान दिले आहे. लोकशाही देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. या लोकशाहीचे संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे. त्यासाठी महिला संसदची गरज आहे. वेगवेगळय़ा क्षेत्रात महिलांनी दाखविलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. लोकशाही मजबूत झाली तर जनता मजबूत होईल. संसद सुदृढ करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी केले.
गोवा सरकारतर्फे अनेक परिषद, समांतर कार्यक्रम : राजेश पाटणेकर
गोवा सरकारतर्फे सेलिब्रेटिंग डेमोक्रसी या संकल्पनेंतर्गत अनेक परिषद आणि समांतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 12 रोजीपर्यंत सदर परिषद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा परिषद ही आज 9 आणि 10 रोजी होणार आहे. ते नैतिक, उत्साही आणि सक्षम युवाकेंद्रित सार्वजनिक नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करते तर तिसरी आणि शेवटची परिषद 11 रोजी होणारी राष्ट्रीय पंचायत संसद गोवा, गावांच्या सक्षम विकासासाठी उपाय शोधण्याचा आणि वितरित करण्याचा प्रयत्न करील. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी विविध योजना साधनसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी दिली.
महिलांना सन्मान द्यावा : चर्चिल आलेमाव
पूर्वी महिलांना घरापुरते मर्यादित ठेवले जायचे. परंतु आज प्रत्येक मुलीला, महिलांना उत्तम शिक्षण देणे आवश्यक आहे. महिलांना सन्मान दिला पाहिजे. लोकशाही लोकांमध्ये असली पाहिजे. पक्षानंतर लोकशाही असली पाहिजे, असे मत आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले.
महिलांना तांत्रिक शिक्षण देणे आवश्यक : निर्मला सावंत
सर्वसाधारण समाजातील महिला व कनिष्ठ वर्गातील महिलांना माणूस म्हणणे कठीण आहे. महिलांना वहाणाचा शब्दप्रयोग केला जात असे. महिलांबाबतीत दृष्टिकोन बदलण्यासाठी अशाप्रकारच्या अधिवेशन, परिषदांची गरज आहे. त्यावेळची आव्हाने आणि आताच्या आव्हानांमध्ये भरपूर फरक दिसून येतो. निवडणुकीवेळीही महिलांना निर्णय घेण्यासाठी पुरूषांचा आधार घ्यावा लागत असे. परंतु आता हे चित्र बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला व मुली अव्वल आहेत. महिलांना तांत्रिक शिक्षण देण्याचीही गरज आहे. महिला ही सर्वव्यापी आहे. महिलापेक्षा दुसरी मित्र कुणी नाही परंतु ती शिक्षित असणे आवश्यक आहे. महिलांप्रति असलेली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान देणे महत्त्वाचे आहे, असे मत निर्मला सावंत यांनी व्यक्त केले.
शिक्षित तरुणांनी राजकारणात येणे आवश्यक : राहुल कराड
2005साली भारतामध्ये एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही संकल्पना सुरू झाली. राजकारणातील प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे. शिक्षित तरूणांनी राजकारणात येणे आवश्यक आहे हा ध्यास घेऊन ही संकल्पना पुढे नेत आहे. नामांकित महिला, तज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. अशाप्रकारचा उपक्रम मागील दीड वर्षापासून करण्याची योजना होती. गोव्यात आंचिमसारखे महोत्सव होतात. परंतु अशाप्रकारच्या उपक्रमाला चालना मिळण्यासाठी लोकशाही महोत्सव म्हणून गोवा सरकारने निधी द्यावा. गोव्याची ताकद म्हणून दर वर्षी आयोजित करावा आणि याची मुहूर्तमेढ मुख्यमंत्र्यांच्याहस्ते रोवली जावी, अशी इच्छा राष्ट्रीय महिला परिषदचे समन्वयक राहुल कराड यांनी व्यक्त केली. याशिवाय सध्या विविध शहरांची, राज्यांची नावे बदलली गेली आहेत. परंतु अजूनही भारत देशाला इंडिया न म्हणता पुढील काळात देशाला भारत म्हणण्यात यावे असे आवाहन राहुल यांनी केले. यावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर व डॉ. गौतम यांनी केले.