संसदेचे पावसाळी अधिवेशन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून याकरता तयारी केली जात आहे. अधिवेशनात भाग घेण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करविणे आवश्यक आहे, पण यंदा अनेक खासदारांना आरटी-पीसीआर चाचणीपासून सूट मिळू शकते. लोकसभा आणि राज्यसभेच्या बहुतांश खासदारांनी कोरोना लसीचे दोन्ही किंवा किमान एक डोस घेतला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2021 आणि त्यापूर्वीचे पावसाळी अधिवशन 2020 मध्ये खासदारांना संसदेत दाखल होण्यासाठी निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल दाखविणे अनिवार्य होते.
कोरोना लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या खासदारांना संसदेत येण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करविण्याची गरज नसल्याची सूचना तज्ञांनी केली आहे. तर लस न घेतलेल्या खासदारांना दर दोन आठवडय़ांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी करविण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यसभेच्या 205 खासदारांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 16 खासदारांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच 95.6 टक्के राज्यसभा खासदारांनी किमान एक तर 88.7 टक्के खासदारांनी दोन्ही डोस प्राप्त केले आहेत. 6 खासदारांनी आरोग्याच्या कारणास्तव कोरोनावरील लस घेतलेली नाही.
लोकसभेच्या 540 खासदारांपैकी 470 खासदारांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. म्हणजेच 87.03 टक्के खासदारांना सभागृहात येण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार नाही. तर 79 टक्के खासदारांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.