प्रतिनिधी / सातारा :
मुलांना पोषण आहार मिळावा म्हणून शाळेत गेल्या अनेक वर्षापासून खिचडी बनवण्यात येत होती. परंतु हा पोषण आहार आता बंद होणार असून, त्या जागी पोषणमूल्ये असणाऱ्या स्लाइस मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयाचे शाळा प्रशासनाने स्वागत केले आहेत. मात्र स्वयंपाकी व मदतनीस महिलांच्या रोजगारावर यामुळे गदा आली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्य शासनाने सन 1995-96 पासून मध्यान भोजन अर्थात शालेय पोषण आहार योजना सुरू केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ती लागू करण्यात आली. प्रारंभी विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ वितरित करण्यात येत होता. मात्र त्याचा गैरवापर होऊ लागल्याने शाळेतच खिचडी तयार करून वाटण्यात येऊ लागली. आठवडाभरात वरण-भात, डाळ तांदळाची खिचडी, मटकी, वाटाणा, हरभरा आदी कडधान्यांची उसळ पोषण आहारामध्ये देण्यात येत होती. त्याचबरोबर खजूर, राजगिरा लाडू, बिस्किटे, केळी आदी वस्तू पूरक आहार म्हणून दिल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.
शाळा पुन्हा सुरू झाल्या तरी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील पोषण आहाराची खिचडी बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना न्युट्रिटीव्ह (पोषक) स्लाइस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांना अधिकाधिक पोषण मूल्ये मिळावीत. यासाठी तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी, सोयाबीन यांसह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठी साखर, खाद्यतेल, मलई विरहित (स्किम्ड) दूध आणि इतर पोषक घटक वापरून ती न्युट्रिटीव्ह स्लाइस बनविण्यात येणार आहेत. ते आकर्षक पद्धतीने पाकिटात सीलबंद करून महापालिका, पालिका, जिल्हा परिषद शाळा तसेच शासनमान्य सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. एका वेळी 24 दिवसांसाठी लागणाऱया स्लाइस पुरविण्यात येणार आहेत. आठवडय़ातून पाच दिवस पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.