मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिंदेशाही सरकारने शिवसेनेचा आणखी एक आमदार फोडत 164 विरुद्ध 99 अशा मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. उशिरा पोहोचल्याने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासहित काँग्रेसचे दहा आमदार मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. तसा काँग्रेसने खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे चार तर भाजपचे दोन आमदार गैरहजर राहिले. समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेतील चाळीस आमदारांचा शिंदे गट, भाजप, बहुजन विकास आघाडी, प्रहार आणि इतर अपक्ष म्हणून 164 आमदारांचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाल्याचे स्पष्ट झाले. अपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद गेले असून फडणवीसांच्या नंतर आता अजितदादा पवार नवे विरोधी पक्ष नेते झाले आहेत. बहुमताच्या चाचणीला सामोरे गेल्यानंतर शिंदे यांनी केलेले भावपूर्ण भाषण आणि त्यामध्ये आपल्या बंडामागची कथा आणि व्यथा त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडतच त्यांचे अभिनंदन केले. भास्करराव जाधव यांनी रामायण, महाभारत आणि पानिपताचे दाखले देत आपण कोणा विरोधात लढतोय याचा शिंदे यांनी विचार करावा असे सांगितले. अपेक्षेप्रमाणे अजित पवारांनी चिमटे काढले. भाजपच्या बाजूने देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार बॅटिंग केली तर शिंदे गटाच्या वतीने गुलाबराव पाटील यांनी खिंड लढवली. खुद्द शिंदे यांचे भाषण मनापासून होते एकदा ते भावूक झाले. नंतर त्यांनी आपल्याविरुद्ध उठणाऱया हाताना इशारा दिला आणि आपल्याला कसे दाबले जात होते याची व्यथाही मांडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या दोन, तीन घोषणा या महत्त्वपूर्ण मानल्या पाहिजेत. त्यामधील एक म्हणजे केंद्राप्रमाणेच राज्याकडूनही पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यात येईल आणि लवकरच मंत्रिमंडळात तसा निर्णय होईल ही सुखद वार्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलचे दर कमी होणार आहेत. दुसरे म्हणजे शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू ही सर्व मुख्यमंत्री करतात ती घोषणा या मुख्यमंत्र्यांनीही केली आहे. रायगडचे हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी थेट जाहीर केला आहे. या तीन घोषणा महाराष्ट्रात सत्तांतराची जाणीव करून देणाऱया आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये होणाऱया उलथापालथीतून जनतेचा लाभ व्हावा ही सर्वसामान्य अपेक्षा असते. पेट्रोलचे दर कमी होतील तेव्हा महाराष्ट्रातील जनता नक्कीच सुखावणार आहे. केंद्रीय निधीच्या बाबतीतील दुष्काळ आता तरी नष्ट व्हावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे तर गृहमंत्री अमित शहा यांनी चट्टान बनून सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प आणि निधी अभावी रखडलेला रस्ते विकास, सिंचन, गृहनिर्माण, लोहमार्ग विकासाला चालना मिळेल, मोठय़ा परदेशी भांडवलदारांची गुंतवणूक महाराष्ट्रात वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कोरोनाच्या काळातसुद्धा गत सरकारला परदेशात गुंतवणुकीचे करार करण्यासंदर्भात मोठा प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील सत्तांतराची जगातील 33 देशांनी नोंद घेतली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरवली आहे. त्यामुळे या नोंद घेतलेल्या राष्ट्रांमधून 2019 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर रखडलेले प्रकल्प पुन्हा येऊ शकतील अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. राजकीय आरोप, प्रत्यारोपाने हे सभागृह गाजणार होते यात नवल नव्हतेच. मात्र या आरोपांच्या पलीकडे राज्यात सरकार नावाची यंत्रणा जी गेले पंधरा दिवस अक्षरशः ठप्प पडली आहे, ती सक्रिय होणे आवश्यक होते. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तेवढेच हजर होते. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार व्हायलाही हरकत नसावी. सत्तांतरासाठी 20 जून रोजी मुंबई सोडून सुरतला गेलेल्या आमदारांबरोबरच मंत्रीही असल्याने त्या खात्यांचा कारभार ठप्प होता. उच्च शिक्षण आणि कृषी या दोन खात्यांचे मंत्री जून महिन्यात मंत्रालयात उपलब्ध असावे लागतात मात्र राजकीय कारणांमुळे त्यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम होता. आता लवकर सर्व विभागांना मंत्री मिळून ठप्प झालेला हा कारभार पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. 11 जुलै रोजी आमदारांच्या पात्रतेच्या बाबतीतील दाखल केसवर सुनावणी आहे. याशिवाय त्यापुढे घडलेल्या घटनाही सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या आहेत आणि विधानसभेतील मतदानादरम्यान ही सभापतींनी घेतलेल्या नोंदी न्यायालयीन वादाचा भाग ठरणार आहेत. त्यावर काय निर्णय होतो यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. लोकसभा सचिवालयाचे माजी सचिव पिडीटी आचारी यांनी एकनाथ शिंदे यांचा दावा पक्षांतरबंदी कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही असे म्हंटले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यात आणि शिंदे यांच्यात पॉवर स्ट्रगल असणार नाही. त्यांची कारकीर्द यशस्वी करण्यासाठी मी झटेन, असे जाहीर केलेले आहे. पण राजकारण्यांनी दिलेले शब्द काळाच्या कसोटीवर क्वचितच खरे ठरतात. अशा स्थितीत शिंदे यांनी आपल्या गाडीला स्टार्टर तर मारला आहे. आता पुढचा प्रवास कसा होतो ते पहायचे.
Previous Articleसातारा पोलिसांचा पुन्हा कारनामा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.