वृत्तसंस्था /मुंबई :
नवीन वर्षाच्या दुसऱया सत्रात चालू आठवडय़ात गुरुवारी मुंबई शेअर बाजाराने (बीएसई)320.62 अंकाची उसळी घेतली आहे. दिवसभरातील व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज – एचडीएफसी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे तेजीची नोंद केली आहे. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 320.62 अंकानी घसरुन निर्देशांक 41,626.64 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेरीस 99.70 अंकानी वधारत निर्देशांक 12,282.20 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये गुरुवारी अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक म्हणजे 4.37 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. सोबत टाटा स्टील, इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो , रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, ओएनजीसी आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला बजाज ऑटो, टीसीएस, इन्फोसिस, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, कोटक बँक आणि हीरोमोटो कॉर्प यांचे समभाग मात्र 0.89 टक्क्यांनी घसरले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
मजबूत जागतिक आणि देशातील संकेतामुळे शेअर बाजार जवळपास 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्याचे समभागांमधील गुंतवणूक अजून वाढविण्याची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. दिवसभरातील व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल ऍण्ड टी यांच्यातील कामगिरीने 2020 चे स्वागत 100 अंकाच्या तेजीने केली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये चढ-उतार पहावयास मिळाले आहे.
मागील महिन्यात जीएसटी संकलन तब्बल दुसऱयादा 1 लाख कोटींचा टप्पा पार केला असून मॅन्युफॅक्चरर्सचा पीएमआयनेही 52 टक्क्यांचा आकडा गाठल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात या घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारात राहणार असल्याचे अनुमान शेअर बाजार अभ्यासकांनी मांडले आहे.