‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याच्या कोरोनाच्या आव्हानाशी देश एकोप्याने संघर्ष करीत आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास याच मंत्राच्या साहाय्याने देशाने गेल्या सात वर्षात विकासाच्या मार्गावर वाटचाल केली असून पुढेही याचेच आचरण केले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी रविवारी आपल्या सरकारच्या दुसऱया कालखंडातील दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याच्या संदर्भात ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
आपल्या दुसऱया काळातील दोन वर्षांचा, तसेच त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या कालावधीचाही आढावा या कार्यक्रमात त्यांनी घेतला. या काळात देशाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. तसेच अनेक अभिमानास्पद क्षण अनुभवले. इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता भारताने आपले निर्णय स्वतः घेतले. अनेक आव्हानांशीही लढावे लागले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कोरोनाचे आव्हान
मार्च 2020 पासून देश कोरोना विषाणूच्या आव्हानाला सामोरा जात आहे. पहिल्या उदेकाला देशवासियांनी एकजूट होऊन परतवले आहे. दुसरा उद्रेकही अशाच प्रकारे हटविला जाईल, हे निश्चित आहे. दोन महिन्यांपूर्वी देशात ऑक्सिजनचा तुडवटा जाणवत होता. आता वैद्यकीय द्रव ऑक्सिजनचे उत्पादन नेहमीपेक्षा दहा पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे ही त्रुटी दूर होण्याच्या गार्मावर आहे. आगामी काळात लोकांचे हित लक्षात घेऊन आणखी पावले उचलण्यात येतील. सरकार जनहिताच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वादळांशी झुंज
देशाच्या पश्चिम सागरतटाला तौक्ते तर पूर्व सागरतटाला यास या वादळांनी तडाखा दिला. या संकटाशीही देशाने संघर्ष केला. आधीच उपाययोजना केल्याने मोठय़ा प्रमाणात जीवितहानी टाळण्यात यश आले. संकटांनी डगमगून न जाता धीरोदात्तपणे उपाय योजना केल्यानेच त्यांच्यावर मात करता येते, हे दिसून आले. देशाची निग्रही मनोवृत्ती स्पष्ट झाली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकासात्मक कामे
ग्रामीण भागातील विद्युतीकरण, नळपाणी योजना, ग्रामीण भागात बँकांचा विस्तार, तसेच जन धन खात्यांची सुविधा आमच्या सरकारने दिली. जन धन खात्यांमुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती सरकारी योजनांचा पैसा थेट येऊ लागला आहे. ही उपलब्धी महत्वाची आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आल्याने नाकाकोपऱयातील भागांमध्येही प्रवास सुविधांची सोय झाली. विशेषतः वनवासी भागांमध्ये याचा अधिक लाभ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण सिद्धतेचा प्रत्यय
देशाला एक वर्षांपूर्वी लडाखच्या सीमेवर संघर्ष करावा लागला. पण ते संकट यशस्वी रितीने हाताळून देशाने आपल्या संरक्षण सिद्धतेचा प्रत्यय आणून दिला, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी चीनचे नाव न घेता केले. देशाच्या सैन्यदलांनी आपल्या निर्धाराचे आणि पराक्रमाचे दर्शन घडविले. कोणताही देश आपल्यावर दबाव आणू शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आव्हानमय कालावधी…
ड दुसऱया कालखंडातील दुसरे वर्ष आव्हानात्मक
ड देशाने एकोप्याने दिली आहे संकटांशी झुंज
ड केंद्र-राज्य संबंधांना मिळाला नव्याने उजाळा
ड कोरोनाच्या दुसऱया उद्रेकावरही मात करणार