19 पैकी 8 दहशतवाद्यांचा खात्मा ः 7 जणांना अटक ः पोलीस अधिकाऱयाने दिली माहिती
वृत्तसंस्था / श्रीनगर
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याला मंगळवारी 4 वर्षे पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्यात सामील 19 दहशतवाद्यांपैकी 8 जणांना कंठस्नान घालण्यात आले, तर 7 जणांना अटक झाली. उर्वरित 4 दहशतवादी अद्याप फरार असून यातील तिघेजण पाकिस्तानी असल्याची माहिती काश्मीर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी मंगळवारी दिली.
पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. जवानांचे बलिदान आम्ही कधीच विसरणार नाही असे मोदींनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी मंगळवारी लेथपोरा पुलवामा वॉर मेमोरियलचा दौरा करत पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या जवळपास सर्व टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. तर उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जैश-ए-मोहम्मदकडे सध्या केवळ 7-8 स्थानिक तर 5-6 सक्रीय पाकिस्तानी दहशतवाती आहेत आणि यातील मूसा सुलेमानी हा मोस्ट वाँटेड असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
दहशतवादी मॉडय़ुलचा भांडाफोड करण्यासह पोलीस नार्को-दहशतवाद आणि दहशतवादाला होणाऱया वित्तपुरवठय़ाविरोधातही कारवाई करत आहे. याप्रकरणांशी निगडित 41 लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अलिकडेच बारामुल्लामध्ये 26 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत असे विजय कुमार यांनी म्हटले आहे.
37 स्थानिक दहशतवादी सक्रीय
दहशतवादी कारवायांमध्ये सामील ओजीडब्ल्यू (ओव्हरग्राउंड वर्कर्स) विरोधात नोंद गुन्हय़ांचा तपास वेगाने केला जात आहे. अशा प्रकरणांची संख्या मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 1600 इतकी होती. आता हे प्रमाण कमी होत 950 वर आले आहे. अशाप्रकरणांमध्ये आतापर्यंत 13 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. काश्मीर खोऱयात सध्या एकूण 37 स्थानिक दहशतवादी सक्रीय आहेत. यातील फारुक नल्ली आणि रियाज छत्री हे जुने दहशतवादी आहेत. उर्वरित जण अलिकडेच दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झाल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील अवंतिपुरा भागात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता. गोरीपुरा गावानजीक झालेल्या या हल्ल्यात 44 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांना नेणाऱया बसला धडकविली होती. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. पुलवामा येथील आत्मघाती स्फोट हा काश्मीरमध्ये 30 वर्षांमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी 350 किलोग्रॅम आयईडीचा वापर केला होता असे तपासात आढळून आले होते.