मोठय़ा पटाच्या शाळा चालणार तीन-तीन तासांच्या सत्रात
प्रतिनिधी / ओरोस:
दीड वर्षाच्या ब्रेकनंतर 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आता केवळ तीन तास नाही, तर नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. ज्या ठिकाणी कोरोना नियमानुसार शाळा नियमित सुरू ठेवणे शक्य नाही, अशा मोठय़ा पटाच्या शाळा या घडय़ाळी तीन तास या प्रमाणे दिवसभरात दोन सत्रात भरणार आहेत. दिवसभर शाळेत थांबणाऱया विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मात्र पालकांना करावी लागणार आहे.
कोरोना संकटामुळे सर्वच शाळा मार्च 2020 पासून मुलांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी, तर शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वर्गही सुरू झाले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी घडय़ाळी तीन तास, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पूर्णवेळ शाळेत थांबण्याचे आदेश होते. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱया शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र यामध्ये बदल झाला आहे. एका वर्गात किती विद्यार्थी बसवावेत, याचे निर्देश असल्याने तशी बैठक व्यवस्था करू न शकणाऱया मोठय़ा पटसंख्येच्या शाळांना एकूण सहा तासांच्या नियमित वेळेपैकी तीन-तीन तासांची दोन सत्रे भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ज्या ठिकाणी ही अडचण भासणार नाही, अशा छोटय़ा पटाच्या सर्व शाळा त्यांच्या नियमित वेळेनुसार संपूर्ण दिवसभर भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत शालेय पोषण आहार दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था ही त्यांच्या पालकांनी करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाकडून निर्देशित करण्यात आले आहे