केंद्रीय पर्यटनमंत्री जी.किशन रेड्डी यांचे उदगार
प्रतिनिधी /मडगाव
स्वामी विवेकानंदजी हे करोडो युवकांचे आदर्श व प्रेरणास्थान होते. त्यांनी दिलेल्या संदेशातून स्फुर्ती घेऊन आज देशभरातील करोडो युवक मार्गक्रमण करीत आहे. भारत देश अन्य कुठल्याच देशाच्या तुलनेत कमी नाही ही स्वामी विवेकानंदजी यांची विचारधारणा होती. हीच विचारधारणा घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे असे उद्गार केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मडगावात बोलताना काढले.
स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त मडगावच्या दामोदर सालात (सुब्राय नायक निवासस्थान) स्वामी विवेकानंदजी यांनी मुक्काम केला होता. त्या स्थळाला काल केंद्रीय पर्यटमंत्री जी. किशन रेड्डी यांनी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट दिली व स्वामी विवेकांनदजी यांना पुष्पाजंली अर्पण केली. यावेळी मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक तसेच प्रदीप नायक उपस्थित होते.
भारत सर्व देशाच्या तुलनेत नक्कीच पुढे जाईल व त्यासाठी देशाला एक शक्तीशाली देश बनिवण्याची गरज आहे. भारत देशाला विश्वगुरू स्थानावर बसविले पाहिजे. आदरणी नरेंद्र मोदीजी यांचे सुद्धा हेच लक्ष असून भारत सरकार देशाला एक शक्तीशाली देश बनिवण्यासाठी कार्यरत आहे असे श्री. रेड्डी या प्रसंगी म्हणाले.
केंद्र सरकार नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात राष्ट्रीय युवा दिन राज्य सरकार, स्थानिक स्वराज संस्था व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहे. यंदाचे वर्ष हे खास असून देश आपले 75वे स्वातंत्र्य वर्ष साजरे करीत आहे. ‘आजदी का अमृत’ महोत्सवाच्या दृष्टीकोनातून हे साजरीकरण बऱयाच ठिकाणी होत आहे. आदरणीय प्रधानमंत्री सुद्धा आज दोन-तीन कार्यक्रमात सहभागी होत आहे असे ते म्हणाले.
भारत सरकारच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त वेगवेळय़ा दृष्टीकोनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हय़ाच संदर्भात आपल्या दृष्टीकोनातून ही सौभाग्याची गोष्ट आहे की, आज गोव्यात ज्या घरात स्वामी विवेकानंद यांचा मुक्काम होता. ज्या घरात ते एक आठवडय़ाहून जास्त काळ थांबले होते. ज्या खुर्चीवर तसे बसले होते. ज्या खोलीत त्यांचा मुक्काम होता. त्या स्थानाला भेट देण्याची संधी आपल्याला मिळाली. या सारखे जीवनात आणखीन काही सौभाग्य नाही असे केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले.
स्वामी विवेकानंदजीचा आदर्श देशातील करोडो नवजवान स्फुर्ती घेऊन पुढे जात आहे. केवळ आजच नाही तर येणाऱया एक हजार वर्षात सुद्धा स्वामी विवेकानंदजीने जो संदेश दिला तो स्फुर्ती दायक व प्रेरणादायक असेल. खास करून गोव्यातील तरूणांना आपण शुभेच्छा देऊ इच्छितो. आम्ही सर्वजण स्वामी विवेकानंदजीच्या स्फुर्तीतून देशाला एक विकासशील देश बनविणार आहोत. भारत देशाला एक युवकाचा देश बनविणार आहोत. देशातील नवजवान आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर देशाला विकासाच्या मार्गावर नेणार आहेत. एक शक्तीशाली देश बनविणार आहेत असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
या स्थळाला नक्कीच मदत करू
स्वामी विवेकानंदजी यांनी दामोदर सालात (सुब्राय नायक निवासस्थान) मुक्काम केला होता. त्याची देखभाल व सौंदर्यीकरण करण्यास सरकार काही मदत करणार का असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, या स्थळाला प्रचंड महत्व आहे. ही वास्तु ऐतिहासिक आहे. त्यामुळे केंद्र सरकार नक्कीच मदत करेल. त्यासाठी केवळ घर मालकांकडून प्रस्ताव येणे जरूरी आहे.