इस्रोने प्रक्षेपित केला नवीन युगातील नेव्हिगेशन उपग्रह : भारतीयांना मिळणार मोठा फायदा
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नेव्हिगेशन उपग्रह ‘एनव्हीएस-01’चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे नेव्हिगेशन प्रणाली आणखी मजबूत होईल. यातील ‘एनएव्हीआयसी’ (नाविक) उपग्रहांच्या मदतीने भारतीय सैन्याला शत्रूंच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळेल. याशिवाय जलवाहतूक सेवाही बळकट केली जाणार आहे.
इस्रोने सोमवारी आपला दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. अंतराळ क्षेत्रात जगात यशाचे अनेक झेंडे रोवणाऱ्या इस्रोची ही एक मोठी कामगिरी ठरली आहे. सध्या भारताकडे 7 ‘एनएव्हीआयसी’ उपग्रह आहेत. त्यापैकी केवळ 4 कार्यरत असून 3 खराब झाले आहेत. जर आपण तिन्ही उपग्रह बदलण्याच्या दृष्टीने पाच नेक्स्ट जनरेशन नाविक उपग्रह ‘एनव्हीएस’ सोडण्याची तयारी केली आहे. त्यानुसार ‘एनव्हीएस-01’ सध्या अवकाशात सोडल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
सकाळी 10:42 वाजता उड्डाण
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 10:42 वाजता ‘जीएसएलव्ही’ने उड्डाण केले. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी पेलोड रॉकेटपासून वेगळे झाले. याने एनव्हीएस-1 उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे सोडला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी उपग्रहाला योग्य कक्षेत ठेवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवत मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
अमेरिकेकडून नकार अन् भारताचे यश
1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांची स्थिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेकडे मदत मागितली होती. त्यानंतर अमेरिकेने जीपीएस सपोर्ट देण्यास नकार दिला. तेव्हापासून भारत स्वत:ची नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली बनवण्यात गुंतला होता. या माहिमेला अखेर यश आले असून उपग्रह विकासाच्यादृष्टीने हे एक आत्मनिर्भर पाऊल असल्याचे मानले जात आहे. ‘एनव्हीएस’ला 2006 मध्ये मान्यता मिळाली होती. 2011 च्या अखेरीस ते पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु ते 2018 मध्ये कार्यान्वित झाले. आता हे नेटवर्क सातत्याने सुधारले जात आहे.
‘नाविक’चे भारताला होणारे फायदे
► झोमॅटो आणि स्विगीसारख्या अन्न वितरण सेवा आणि ‘ओला-उबेर’सारख्या सेवा नेव्हिगेशनसाठी जीपीएस यंत्रणा वापरतात. ‘नाविक’ या कंपन्यांसाठी खर्च कमी करू शकते आणि अचूकता वाढवू शकते.
► ‘नाविक’मुळे भारताचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करेल आणि आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षा सुधारेल. मच्छीमार, पोलीस, लष्करी आणि हवाई/जलवाहतूक यांना चक्रीवादळाच्या वेळी उत्तम नेव्हिगेशन सुरक्षा मिळणार.
► ‘नाविक’ यंत्रणा तंत्रज्ञान प्रवास आणि पर्यटन उद्योगाला मदत करू शकते. याद्वारे, टूरमध्ये अधिक माहितीपूर्ण आणि परस्परसंवादी तपशील प्राप्त होऊ शकतो. तसेच सामान्य लोकही ‘लोकेशन’साठी प्रभावीपणे वापरू शकतात.