ओडिशातील रेल्वे दुर्घटनेला उलटले 120 तास : काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव लक्ष्य
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
ओडिशातील रेल्वे दुर्घटनेला आता 120 तासांहून अधिक काळ उलटला आहे. तरीही अद्याप 91 मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. तर अनेक मृतदेहांवर एकाहून अधिक कुटुंबांनी दावा केल्याने वादाचे प्रसंगही उभे राहिले आहेत. या रेल्वे दुर्घटनेनंतर अनेक जण बेपत्ता असून त्यांच्या शोधात त्यांचे कुटुंबीय रुग्णालय तसेच पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारत आहेत. या पूर्ण दुर्घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी केला आहे. रेल्वेमंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळेच बालासोर रेल्वे दुर्घटना घडली असून यात 288 जणांना जीव गमवावा लागला तसेच 1 हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. सीबीआयने याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नेंदवावा असे वक्तव्य काँग्रेस प्रवक्त्याने केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी दुर्घटनेनंतर केलेले नाटक पाहता त्यांना ऑस्कर पुरस्कार दिला जावा, अशी उपरोधिक टीकाही अजय कुमार यांनी केली आहे.
1 मृतदेह, 5 दावेदार
एका प्रकरणात मृतदेहावर 5 जणांनी हा आपल्या नातेवाईकाचा मृतदेह असल्याचा दावा केला आहे. मोहम्मद इनाम उल हक यांच्यानुसार हा मृतदेह त्यांच्या भाच्याचा आहे. तर उर्वरित दावेदारही स्वत:च्या दाव्यावर ठाम राहिल्याने आता मृतदेहाची डीएनए टेस्ट करविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
30 डीएनए नमुने एम्समध्ये पाठविले जाणार
ज्या मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही, त्यांची ओळख डीएनए तपासणीद्वारे केली जाणार आहे. मृतदेहांवर दावा करणाऱ्या संबंधितांच्या डीएनएचे नमुने दिल्लीतील एम्समध्ये पाठविले जाणार आहेत. तेथून 7-8 दिवसांमध्ये अहवाल प्राप्त होणार आहे. अहवालानंतरच संबंधितांना मृतदेह सोपविला जाणार असल्याची माहिती भुवनेश्वर महापालिकेने दिली आहे.
भरपाईदाखल 2 हजारांचा नोटा
पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ असलेल्या तृणमूल काँग्रेसने रेल्वे दुर्घटनेतील पीडितांना भरपाईदाखल 2 हजार रुपयांच्या नोटा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. दक्षिण 24 परगणा येथील एका कुटुंबाला 2 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल तृणमूल काँग्रेसकडून देण्यात आल्याचा दावा करणारा व्हिडिओ बंगाल भाजप अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी शेअर केला आहे. भरपाई दिली जाणे चांगली बाब असली तरी ती 2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये देणे योग्य नाही. या नोटा बदलण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. आता या कुटुंबाला बँकेत जाऊन या नोटा बदलून घ्याव्या लागतील. ममता बॅनर्जी यांचे सरकार 2 हजार रुपयांच्या नोटा देऊन काळा पैसा वैध करत असल्याचा आरोप मजूमदार यांनी केला आहे.