राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन : राज्य सरकारचा निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह राज्यातील 9 जिल्हे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत घेण्यात आला. बेळगाव, धारवाड, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर, म्हैसूर, कोडगू, गुलबर्गा, मंगळूर जिल्हे 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी, राज्यात सोमवारही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री 9 पासून 11 पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच राज्यातील 9 जिल्हे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सोमवारी विधीमंडळाचे अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या 9 जिल्हय़ातंर्गत असणारी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जास्त कर्मचारी असणाऱया कंपन्यांमधील निम्म्या कर्मचाऱयांना दिवसाआड कामावर नेमण्यात यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे, असेही बोम्माई म्हणाले.
बंद राहणार
1) 31 मार्चपर्यंत जिल्हय़ातंर्गत असणारी प्रवासी वाहतूक
2) बार, रेस्टॉरंट, क्लब, पब, कॅब, मॉल
3) राज्यभरातील सर्व एसी सरकारी बससेवा
सुरू राहणार
1) किराणा, दूध, फळे, पालेभाज्यांची दुकाने, वैद्यकीय, पेपर, औषध
3) राज्यातील सर्व सरकारी कार्यालये खुली राहणार
राज्यात एकाच दिवशी आढळले 6 रुग्ण
बेंगळूर 17
धारवाड 1
उत्तर कन्नड 1
गुलबर्गा 3
कोडगू 1
चिक्कबळ्ळापूर 2
म्हैसूर 1
एकूण 26
राज्यभरात दिवसेंदिवसा कारोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी एकाच दिवशी राज्यात 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. धारवाडमध्ये एक, चिक्कळ्ळ्ळापूर जिल्हय़ात एक, बेंगळूरमध्ये 3, उत्तर कन्नड जिल्हय़ात एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
बेंगळुरातील नम्म मेट्रो बंद
देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने खबरदारी म्हणून बेंगळूर शहरात प्रवाशांना वाहतुकीची सुविधा पुरविणारी नम्म मेट्रो सेवा स्थगित करण्याचा राज्य सरकारने आदेश दिला आहे.
धारवाडमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
हुबळी : ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत आणि गोवाद्वारे धारवाड शहरात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा चोळन यांनी दिली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.सदर व्यक्तीचे 12 मार्च रोजी विदेश दौऱयावरून धारवाड शहरात आगमन झाले होते. दरम्यान, त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने 18 रोजी खासगी ईस्पितळात उपचारासाठी दाखल झाले होते. यावेळी रोगाची लक्षणे दिसल्याने घशातील कप शिमोगातील व्हीडीआयएल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याचा अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. सदर व्यक्तीचे वय 33 असून तो न्यू यल्लापूरचा रहिवासी आहे. त्यामुळे न्यू यल्लापूर प्रदेश कंटैनमेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथील आजूबाजूच्या 3 किमी. व्याप्तित सार्वजनिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या व्यक्तीवर हुबळीच्या किम्समध्ये उपचार दिले जात आहेत. तसेच याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकार तयार असून अधिकाऱयांच्या नेतृत्त्चाखाली दहा पथकांची नेमणूक केली आहे.
1) मिना नागराज (आयएएस) संचालिका अटलजी जनस्नेही केंद्र-अतिरिक्त कर्तव्य : रुग्णांशी संपर्क साधून शोध घेणे. विदेशातून राज्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवणे.
2) अरुंधती नागाराज (आयएएस) : कम्युनिटी सर्वेलाईन, कोरोना ट्रेसिंग, होम ऐसोलेशनची जबाबदारी
3) डॉ. सी. एस. मंजुनाथ, संचालक जयदेव हृदयरोग संस्था : अतिरिक्त जबाबदारी, लॅब टेस्टिंग
4) गौरव गुप्ता (आयएएस) आणि गंजन कृष्णा (आयएएस) : सर्व साहित्य खरेदी करणे, उत्पादन व्यवस्थापनाची जबाबदारी
5) पी. सी. जाफर (आयएएस) : प्रशिक्षणाची जबाबदारी
6) गंगाराम वडेरिया (आयएएस) आणि एस. झियावुल्ला : रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवून त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी
7) टी. के. अनिलकुमार : नियतकालिक नियोजन आणि सर्व जिल्हाधिकाऱयांशी समन्वय साधण्याची जबाबदारी
8) ई. व्ही. रमणरेड्डी : माहिती तंत्रज्ञान संस्था, आंतरजाल संस्था आणि विद्युत कंपन्यांशी समन्वर साधणे
9) सी. शिखा : रिस्क कम्युनिकेश, सोशल मिडिया, कोरोना वेबसाईट, पोस्टर्स, व्हिडीओंची जबाबदारी
10) मुनिश मौदगील : 104 क्रमांकाचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान विकास व्यवस्थापन आणि आरोग्य हेल्पलाईनची जबाबदारी