राजेंद्र शिंदे/ चिपळूण
कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या बहुतांश परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावची वाट पकडली आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग, विकास प्रकल्पांसह सर्वच क्षेत्रात कामगार व तंत्रज्ञांची मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे. कोकणी तरूणांसाठी ही पोकळी भरून काढतानाच स्वत:ला रोजगार मिळवण्याची नामी संधी चालून आली आहे. कोरोनाने कोकणात स्थानिकांसाठीच्या रोजगाराचा ‘टॉप गियर’ टाकला आहे. ‘व्हाईट कॉलर’चा हव्यास सोडून थोडेसे कष्ट उपसण्याची तयारी दाखवली तर कोकणी माणसालाच कोकणात राज्य करण्याची संधी मिळणार आहे.
कोरोनाचा साऱया जगाबरोबरच कोकण प्रदेशालाही मोठा फटका बसला आहे. मत्स्य, आंबा, काजूसह अन्य पिकातून व पर्यटनातून उन्हाळयाच्या शेवटच्या 2-3 महिन्यात वर्षभराचे उत्पन्न घेतले जाते. मात्र 44 दिवसानंतरही कोकण पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ आहे. उद्योग, कृषी, पर्यटन, मत्स्य, विकासात्मक प्रकल्प या साऱयांनाच याची जबर झळ पोहोचली आहे. आज, उद्या लॉकडाऊन उठेल. मात्र त्यानंतरची परिस्थिती अनेक बाबतीत खूपच वेगळी असणार आहे. त्यावेळी अनेकांच्या रोजगारावर टाच आलेली असेल. व्यवसायात तोटा आलेला असेल. काही कुटुंबे आर्थिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झालेली असतील. मात्र एखादे वादळ येते अणि निघून जाते, त्याप्रमाणेच कोरोनाही निघून जाईल. संकटात अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे कोरोना लॉकडऊनमध्येही बरेच काही शिकायला मिळाले आहे. यातून कोकणी तरूणांनी स्थानिक स्तरावरच उपलब्ध झालेला रोजगार पटकावण्याचा धडा घेतला तर निश्चितच स्वत:चे, गावाचे, तालुका, जिल्हा आणि समृध्द कोकणचे स्वप्न दूर नाही.
कोकण म्हटलं की मुंबई, पुणेकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर जगणारा प्रांत…अशीच ओळख होती. यात काहीसा बदल झाला असला तरी काहीसे तसेच चित्र आजही कायम आहे. पूर्वी बाबा गेला म्हणून काका गेला… ते गेले म्हणून लेकही गेला… पुढे एकास एक करत सारेच ‘कर्ते’ कोकण सोडून इतरत्र उदरनिर्वाहासाठी बाहेर पडले. त्यामुळे गेल्या 20- 25 वर्षात कोकणातील अनेक गावे अक्षरश: रिकामी झालेली पहावयास मिळतात. इथल्या मुलींची मानसिकताही लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांना इथे राहणारा तरूण नको, मुंबईकरच हवा. तेथे झोपडपट्टीत रहायलाही त्या तयार असतात. त्याचाही मोठा परिणाम अलिकडे होत गेला.
‘व्हाईट कॉलर’चा हव्यास आणि कष्ट उपसण्याची तयारी नसल्याने कोकणी तरूण घराबाहेर पडून मोठमोठय़ा शहरांतील झगमगत्या दुनियेत रमराण झाला. कालानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. गावाकडेही उद्योगधंदे आले. त्यामध्ये कष्टाचे काम करण्यास कोणीच तयार नसल्याने राज्याबाहेरील मजुरांचे लोंढे आले. आणि बघता-बघता कोकणातील रोजगार परप्रांतीय ठेकेदार आणि मजुरांच्या हाती गेला आहे. गंमत म्हणजे याचवेळी कोकणी तरूण मात्र हाताला काम नाही म्हणून मुंबई-पुणेला निघून गेला. हे चित्र बदलण्याची संधी कोरोनाने कोकणी तरुणांना देऊ केली आहे. या संधीचे काय होते, ते येणारा काळच सांगणार आहे.