ए.आर.ए च्या पदाधिकाऱ्यांनी पकडला: वन विभागाच्या ताब्यात
इस्लामपूर/प्रतिनिधी
येथील अनिमल रिट्रायविंग असोसिएशन(ए.आर. ए.)चे अध्यक्ष,सर्पमित्र विकास माने व पदाधिकारी यांनी कोयना धरणाच्या शिडीवर असणारा नऊ फुटाचा अजगर सुरक्षित बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात दिला. हा अजगर अडचणीच्या ठिकाणी असूनही त्याला जीवदान देण्यात यश आले.
धरणावरील कर्मचारी वेळी नेहमीप्रमाणे पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले होते. पातळी पाहण्यासाठी लावलेल्या मोजपट्टीच्या शेजारी असलेल्या मोठ्या अँगलच्या शिडीवर त्यांना हा भलामोठा साप दिसला. त्यांनी तात्काळ ही वरिष्ठांना कल्पना दिली. वरिष्ठांनी कोयना वन्यजीव चे वनरक्षक अतुल खोत यांच्याशी संपर्क साधून साप असल्याचे कळवले. वनरक्षक खोत यांनी महाराष्ट्र अनिमल रिट्रायविंग असोसिएशन(ए. आर.ए.) चे माने यांना कळवले. माने हे सहकारी अश्वजित जाधव यांच्यासह धरणाच्या भिंतीवरती पोहचले.
अजगर धरणातील पाण्यात उतरण्यासाठी असलेल्या शिडीवर बसला होता. तिथे पोहचणे अवघड होते. खाली जायचं म्हणलं तर एका हाताने अँगल व दुसऱ्या हाताने अजगर पकडावा लागणार होता. पण अजगराने अँगल ला पिळा घातल्यास त्याला एका हाताने काढणे अवघड होणार होते. जरासा तोल गेला तर सरळ धरणाच्या पाण्यात पडण्याची भीती होती. पण त्याला सुखरूप पकडून जंगलात सोडणे महत्वाचे होते. सर्पमित्र विकास माने यांनी त्याला खाली जाऊन चिमट्याच्या साहायाने वर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खाली उतरुन एका हाताने अँगल व दुसऱ्या हातात चिमट्याच्या साहाय्याने त्या अजगराला पकडले.
दरम्यान अजगराने अँगलला पिळा घातला. त्याचे वजनही जास्त असल्यामुळे त्याला वर काढण्यात अडथळा येत होता. त्यामुळे सहकारी अश्वजित जाधव यांच्याकडे अजगर पकडलेला चिमटा देऊन माने यांनी अजगराचा पिळा काढून शेपटीच्या साहाय्याने वरती काढले. नंतर त्याला व्यवस्थित पकडून मोठ्या कापडी पिशवीत घालण्यात आले. अजगर हा साप निशाचर आहे, त्यामुळे त्याला रात्री वनविभागाच्या अधिकाऱ्यां समवेत जंगलात सोडण्यात येणार आहे.
भारतीय अजगराला इंग्रजीमध्ये इंडियन रॉक पायथन असे म्हणतात. याची अधिकतम लांबी 24 फुटापर्यत असते. जानेवारी ते मार्च हा मिलनाचा कालावधी असून, मादी पालापाचोळ्याचा ढीग करून त्यात 20 ते 80 अंडी घालते. या सापाचे मुख्य खाद्य उंदीर, घुस अश्या छोट्या प्राण्यांपासून माकड, कोल्हा, कुत्रा, वासरू, सालींदर, बिबट्या हे आहे. हा साप भारतात सर्वत्र आढळतो. या सापाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. पण हा साप पूर्णपणे बिनविषारी असून माणसाला यांच्यापासून कसल्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच या सापाला वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत जास्त संरक्षण आहे. त्यामुळे याला मारल्यास मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे असा किंवा इतर कोणताही साप आढळल्यास तात्काळ जवळच्या वनविभागाशी अथवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन माने यांनी केले.