रात्रीचे जेवण व मदिराही : ग्रा. पं. निवडणुकीचे वातावरण तापले
प्रतिनिधी/ संकेश्वर
ग्राम पंचायतीच्या निवडणूक प्रचाराने ग्रामीण भागातील वातावरण सध्या थंडीतही चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध शक्कल लढवीत प्रचाराचा एक-एक दिवस पार पाडताना दिसत आहे. मतदानाची वेळ जसजसी जवळ येत आहे, तसतशी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारफेरीत गर्दीसाठी मनुष्यबळ दिसण्यासाठी त्यांना भाडेतत्वावर सहभागी करुन घेतले आहे.
उमेदवारासोबत दिवसभर फिरणाऱया कार्यकर्त्यांना प्रत्येकी 500 रुपये व रात्रीचे जेवण व मदिरा तर रात्री प्रचारासाठी येणाऱया प्रत्येक कार्यकर्त्याला 200 रुपये देण्यात येत आहेत. भाडोत्री सहकारी घेऊन प्रचाराला चांगलाच रंग भरल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक मर्यादा दिली आहे. पण प्रचारासाठीचा खर्च पहाता मर्यादेच्या सीमेपलीकडे वाटत आहे. ग्राम पंचायतीला शासनाकडे थेट विकास निधी मिळत असल्यामुळे गावभागातील नेत्यांचे ग्राम पंचायतीस प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी आघाडीचे प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वी चिनमुरे, चहा आदींवर होणारी ग्राम पंचायत निवडणूक आता आमदारपदाच्या निवडणुकीसारखी भासू लागली आहे. प्रचारासाठी रात्रीचाही दिवस करुन मतदारांपर्यत पोहचले जात आहे. दिवसागणिक प्रचाराचे चित्र बदलत आहे. प्रचारात सहभागी झाल्यास जेवणावळीसह मिळणाऱया वेतनामुळे निवडणुकीत एकप्रकारे रोजगारच उपलब्ध झाला आहे. परिणामी शेतीसह इतर कामांना मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.