अतिवेग, घाईमुळे घडतात अधिकाधिक अपघात
प्रतिनिधी / पणजी
वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होणे सुरुच असून, वाहन अपघात मृत्यू होणाऱयांची संख्याही वाढत आहे. एक महिन्यात तब्बल 24 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. अपघतात मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकाधिक 30 वर्षाखालील युवकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या वाहतूक सुरक्षा महिना सुरु असून पोलीस वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. उच्च माध्यमिक विद्यालये, बसस्थानक तसेच इतर अनेक ठिकाणी वाहनचालकांना एकत्र करून त्यांना वाहतुकीविषयी माहिती दिली जाते. सर्व स्तरावरील पोलीस कर्मचारी वाहतुकीविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. तरीही अपघात सुरुच असून वाहन अपघातात ठार होणे काही थांबत असल्याचे दिसून येत नाही.
जानेवारीत 300 अपघातांमध्ये 24 जणांचा मृत्यू
जानेवारी 2021 मध्ये एकूण 300 अपघात झाले आणि त्यात 24 जणांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या 23 असून 78 जण किरकोळ जखमी झाले आहेत. 2020 जानेवारी महिन्यात 342 अपघात झाले होते व 27 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 सालापेक्षा ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांची मालिका सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
2020 या संपूर्ण वर्षात 2375 एकूण अपघात झाले होते. त्यात 223 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2019 सालात 3440 वाहन अपघात झाले होते त्यात 292 जणांचा मृत्यू झाला होता. दर वर्षी वाहन अपघातांची संख्या किंचीतपणे कमी होत आहे ही जरी खरे असले तरी अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.
बेदरकारपणे वाहतन चालविणाऱयांच्या संख्येत वाढ
बेदरकारपणे वाहन चालविणाऱयांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सिग्नल तोडणे तसेच अतीवेगात वाहने चालविणे असे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहेत. जे वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना पोलिसांच्या तावडीत सापडतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. कोविड19 महासंकटाच्या काळात मद्यपान करून वाहने चालविणाऱयांची तपासणी करणेही बंद करावे लागले तरीपण एखादा वाहनचालक अतीमद्यपान करून वाहन चालविताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जात आहे.
घाई केल्याने होतात अनेकवेळा भीषण अपघात
दरवर्षी वाहनांची संख्याही वाढत असून रस्त्यांची स्थितीही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या अपघातांवर नियंत्रण आणायचे असल्याच प्रत्येक वाहनचालकांने स्वतःवर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे. घाई केल्याने अपघात होतात. चुकीच्या ठिकाणी ओव्हर टेक करून वेगाने वाहन चालविल्याने अपघात मोठय़ा प्रणात झाल्याचे दिसून येत आहे. अधिकाधिक दुचाकी चालक हे अतीवेगामुळेच आपला प्राण गमवत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक पोलिसांना फसवित नसतात तर ते आपल्या मृत्यूला निमंत्रण देत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी स्वतःला सावरणे काळाची गरज आहे, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे