कुडाळ राईस मिलला वादळाचा प्रचंड तडाखा : सव्वादोन कोटीचे नुकसान : संरक्षक भिंत कोसळली
वार्ताहर / कुडाळ:
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा कुडाळ-नवी एमआयडीसी येथील बजाज सिंधुदुर्ग राईस मिलला बसून प्रचंड हानी झाली. वाऱयाने राईस मिल तसेच गोदामाचे फायबर व लोखंडी पत्रे उडून गेल्याने आतील 660 मेट्रिक टन तांदूळ व 600 मेट्रिक टन भात भिजून गेले. संरक्षक भिंत कोसळून छपराचे मोठे नुकसान झाले. या कंपनीचे कामगार तेथे वास्तव्यास होते. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यात अंदाजे सव्वादोन कोटींचे नुकसान झाले.
रविवारी या चक्रीवादळासह पावसाने सिंधुदुर्ग जिल्हय़ातील किनारपट्टीसह अन्य भागात हाहाकार उडविला. प्रचंड पडझड होऊन मोठे नुकसान झाले. या वादळाचा फटका बजाज सिंधुदुर्ग राईस मिललाही बसला. सोसाटय़ाच्या वाऱयाने या मिलची यंत्रसामुग्री असलेल्या इमारती तसेच गोदाम इमारतीवरील छपराचे पत्रे उडाले. वाऱयाच्या तीव्रतेने अक्षरशः दाणादाण उडविली. तेथे असलेल्या कामगारांनी जीव मुठीत धरून हा थरकाप अनुभवला. छपराचे पत्रे उडून गेल्याने इमारतींमध्ये पावसाचे पाणीच पाणी झाले.
प्रवेशद्वार उखडून पडले
वादळाच्या तडाख्यासमोर आतील तांदूळ व भात बियाण्याचे संरक्षण करणे मुश्किल होते. तेथील प्रवेशद्वार उखडून पडले. एवढी त्या वाऱयाची रौद्रता होती.
भात-तांदुळ साठा भिजला
या मिलमध्ये शासनाने शेतकऱयांकडून खरेदी केलेल्या भातावर प्रक्रिया करून तांदूळ तयार केला जातो. तसेच मिलचा स्वमालकीचा भात व तांदुळ साठाही केला जातो. हा साठा भिजून गेला. फायबर पत्रे असलेल्या इमारतीमधील तांदळाचा साठा केलेल्या गोदामाच्या छपराचे पत्रे वादळी पावसामध्ये उडून गेले. त्यामुळे मिलच्या यांत्रिक सामग्री (मशिनरी) मध्ये साठा केलेले तांदूळ भिजून नुकसान झाले. तसेच शासनाकडून भरडाईसाठी घेतलेल्या भात साठवणुकीच्या गोदामाच्या छपराचेही लोखंडी पत्रे उडून गेल्याने आतील भात भिजून नुकसान झाले.
फायबर-लोखंडी पत्रे निकामी
या कंपनीमधील मेन इलेक्ट्रिक पॅनेलचेही पत्रे उडून गेले. राईस मिलमधील पंप हाऊसच्या छपरावर संरक्षक भित कोसळून छप्पर मोडले. शासनाला देण्यासाठी भरडाई करून ठेवलेले अंदाजे 160 मेट्रिक टन तांदळाचे व स्वमालकीच्या 500 मेट्रिक टन तांदळाचे तसेच भरडाई करण्यासाठी शासनाकडून उचल केलेल्या अंदाजे 550 ते 600 मेट्रिक टन साठय़ामधील भात भिजून नुकसान झाले. फायबर व लोखंडी पत्रे मोठय़ा प्रमाणात निकामी झाले. यात सर्व मिळून अंदाजे सव्वादोन कोटीचे नुकसान झाले.
कामगारांच्या सुरक्षिततेची कंपनीकडून दक्षता
कामगार सुरक्षित राहवेत, यासाठी कंपनीने प्रथम दक्षता घेतली. वाऱयाचा जोर व पाऊस कमी झाल्यानंतर त्या इमारतीमधील भिजलेले भात व तांदूळ साठय़ावर प्लास्टीक आच्छादन घालण्यात आले. या नुकसानीबाबत बजाज सिंधुदुर्ग राईस मिल लि. कंपनीचे व्यवस्थापक यतीन मयेकर यांनी ही माहिती दिली.