त्यापेक्षा डासांची उत्पत्तीच रोखणे महत्त्वाचे : जनजागृतीवर भर देण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी / पणजी
डेंग्यू वा चिकुनगुनिया यासारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोगिंग हा उपाय होऊ शकत नाही. त्यापेक्षा डासांची उत्पत्तीच होणार नाही याकडे जादा लक्ष दिले पाहिजे. याकामी प्रत्येक नगरसेवक, पंचसदस्याने पुढाकार घेऊन स्वतःच्या प्रभागात लक्ष दिल्यास आणि जनजागृती केल्यास या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो, असे मत वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी व्यक्त केले.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी उपस्थित केलेल्या संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याने त्यावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. मडगाव तसेच काणकोण आणि अन्य इस्पितळांमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वत्र फोगिंग करण्यात यावे, अशी मागणी जवळजवळ प्रत्येक सदस्याने केली.
काही पालिका परिसरात फोगिंग करण्यात येते. परंतु अनेक पालिका तसेच ग्रामपंचायत पातळीवर तसा प्रकार दिसून येत नाही. अशी यंत्रे घेण्यासाठी एकतर त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही किंवा यंत्रे खरेदी करण्यासाठी निधी नाही, यासारखी कारणे देण्यात येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपाय म्हणून आरोग्य खात्याने एकतर आपले अनुभवी कर्मचारी पाठवून अशा परिसरात फोगिंग करावे, किंवा पंचायतींना स्वतःची फोगिंग यंत्रे करेदी करण्यासाठी निधी पुरवावा, अशा सूचना या सदस्यांनी केल्या.
दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आलेक्स सिक्वेरा, व्हेन्झी व्हिएगश, दाजी साळकर आदींनी या चर्चेत भाग घेतला. सभापती रमेश तवडकर यांनीही आपल्या मतदारसंघातील डेंग्यू समस्या मांडताना त्यावर त्वरित उपाययोजना कराव्या अशी सूचना मांडली.
श्री. कामत यांनी बोलताना या फवारणीबाबत कोणतीही पालिका गंभीर नसल्याचा आरोप केला. त्यामुळे आरोग्य खात्यानेच याकामी पुढाकार घ्यावा, खात्याकडे उपलब्ध असलेल्या अनुभवी कर्मचाऱयांना हंगामी तत्वावर पालिकांमध्ये पाठवून फवारणी करवून घ्यावी, अशी सूचना केली.
श्री. व्हिएगश यांनी या चर्चेत भाग घेताना कुक्कूट आणि वराहपालन होत असलेल्या ठिकाणी डेंग्यूचा फैलाव जास्त प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आणले. अशा ठिकाणांकडे सर्वाधिक लक्ष देताना संबंधित भागात डासांची निर्मिती होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
श्री. साळकर यांनी मात्र वेगळाच अनुभव सांगितला. डासांपासून बचावासाठी फवारणी केली तरी धुराचा प्रभाव संपल्यानंतर डास पुन्हा त्याच ठिकाणी येतात, असे ते म्हणाले. त्यामुळे फोगिंग ही उपाययोजना ठरू शकत नाही. त्यापेक्षा डासांची उत्पत्तीच होणार नाही याकडे लक्ष देणे जास्त प्रभावी ठरू शकते, असे ते म्हणाले. त्यासाठी पंचायत पातळीपासूनच प्रत्येक लोकप्रतिनिधीने स्वतःच्या प्रभागावर लक्ष ठेवावे. पावसाळ्यापूर्वी तेथील करवंटय़ा, जुने टायर्स, यासारख्या पाणी भरून राहणाऱया वस्तुंची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी राज्यात डेंग्यू रुग्ण वाढत असल्याची कबुली दिली. यावर्षी आतापर्यंत राज्यात डेंग्युचे 102 रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल, तसेच त्याचबरोबर फोगिंगसाठीही शक्य तेवढे प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. डेंग्यू रुग्णांवर त्या त्या भागातील आरोग्य केंद्रातच उपचार करण्यात येतील. त्यामुळे रुग्णांना गोमेकॉत पाठविण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊन गोमेकॉवरील ताणही कमी होईल, असे ते म्हणाले.