कडेगाव, प्रतिनिधी
Vishwajeet Kadam On BJP : देशात भाजपा सरकारने अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे सूतोवाच राज्याचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.शाळगाव(ता.कडेगाव) येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद पदयात्रेस संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, युवक नेते डॉ.जितेश कदम,दिग्विजय कदम,जि. प. माजी अध्यक्षा मालन मोहिते,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव,माजी उपसभापती विठ्ठल मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, सन २०१४ साली देशात सत्तेत येताना,भाजपाने जनतेला खोटी स्वप्ने दाखवली. सत्तेत आल्यानंतर देशातील जनतेचा त्यांना विसर पडला आहे. लोकशाहीच्या देशात भाजपा हुकूमशाही पध्दतीने वागत आहे.आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याकडे एकतर दुर्लक्ष करायचे नाहीतर,सत्तेचा वापर करून लाठीचार्ज किंवा गोळीबार करायचा असे अनेक प्रकार आपण पाहत आहोत. पंजाबचे शेतकरी तब्बल ९ महिने रस्त्यावर बसले. त्यांच्या दिल्ली येथील आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. मणिपूरच्या घटनेनंतर देशात माता-भगिनी सुरक्षित नसल्याचे दिसून आले. देशात माता-भगिनींचे रक्षण होत नसेल तर ती भारत मातेची आत्महत्याच असल्याचा घणाघात त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,वारकऱ्यांच्यावर सुद्धा या देशात लाठीचार्ज होत आहेत ही बाब अतिशय गंभीर आहे.जालना येथे शांततेत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनावर सुद्धा लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला.संविधानात्मक पध्दतीने करण्यात येणारे प्रत्येक आंदोलन बळाच्या व सत्तेच्या जोरावर मोडून काढण्याचे काम भाजपा करत आहे. विरोधी आमदार-खासदार यांचे आवाज दाबण्यात येत आहेत. महागाई,रोजगार,महिला संरक्षण,मराठाआरक्षण,धनगर आरक्षण यासह अश्या सगळ्या बाबींवर हे शासन अपयशी ठरले असून, केवळ सत्ता हा एकच कार्यक्रम यांच्याकडून सुरू आहे.
गेल्या ९ वर्षात लोकशाही पध्दतीने निवडून आलेली ९ राज्यातील सरकारे पाडण्याचे पाप यांनी केले आहे तर आरक्षणाच्या मुद्दा वर मराठा व ओ.बी.सी.संघटनामध्ये जातीयवादी वाद पेटवण्याचा डाव सुरू आहे. देशात असे वातावरण असताना राहुल गांधी नावाचा युवक साडे तीन हजार किलोमीटर चालला असून संविधांत्मक पध्दतीने आपल्या साठी लढत आहे व हा युवक येणाऱ्या काळात निश्चितच देशातील वातावरण बदलेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विशाल पाटील , डॉ जितेश कदम, बाळकृष्ण यादव, सुनिल जगदाळे, संभाजी मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. युवक नेते हर्षवर्धन कदम नगरसेवक सागर सकटे, विजय भोसले, सरपंच महेश कदम, दीपक भोसले,विजय नांगरे, विनायक पवार, सूरज पवार, नयना शिंदे,शोभा मोहिते,सुवर्णा पाटील,सरपंच वंदना सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार युवक नेते सुरेश मुळीक यांनी मानले.