बिहारमधील अनोखे गाव
बिहारच्या सीवान जिल्ह्यातील एक गाव सध्या चर्चेत आले आहे. या गावात कुटुंबांच्या संख्येपेक्षा नौकांची संख्या अधिक आहे. या गावाचे नाव तीर बलुआ असून ते गंडक अन् शरयू नदीच्या काठावर आहे. येथील लोकांना नौका बाळगणे छंद नसून त्यांची गरज आहे. या गावातील लोकांचा बराचसा वेळ नौकेवरच जात असतो. ग्रामस्थांची अनेक कामे नौकेवरच पार पडत असतात.
या गावात राहणाऱ्या एकूण कुटुंबांची संख्या 120 आहे. तर येथील नौकांची संख्या 150 च्या आसपास आहे. म्हणजेच येथे कुटुंबांच्या संख्येपेक्षा नौकांची संख्या अधिक आहे. येथील लोकांकडे बाइक, कार किंवा अन्य साधने मिळणार नाहीत, तर प्रत्येक घरात एक नौका दिसून येईल. या गावातील लोकांची दैनंदिन कार्ये देखील नौकेच्या मदतीनेच पार पडतात.
येथे प्रत्येक वर्षी नद्यांना पूर येतो. यामुळे या लोकांना नौकेचीच मदत हेते. नदीच्या काठावर सुरक्षाभिंत बांधल्यास पूराच्या समस्येपासून लोकांना दिलासा मिळू शकतो. पूरसंकटावेळी आपत्ती विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळत नाही. तसेच पिकांचे देखील मोठे नुकसान होते. पोट भरणे देखील अवघड ठरत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. येथील ग्रामस्थ स्वत:चा नौका तयार करतात. नौकेसाठी आवश्यक सामग्री खरेदी केल्यावर एका आठवड्यात ती तयार केली जाते. नौका तयार करण्यास येथील लोक पारंगत आहेत. एक नौका तयार करण्यासाठी 25-30 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.