पाचव्या दिवशी चारशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन : मनपा-प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 22 वाहनांची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
नदी, विहिरी आणि वाहत्या पाण्यामध्ये पीओपी गणेशमूर्ती विसर्जित करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कुंडांसह फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. पाचव्या दिवशीच्या विसर्जन सोहळय़ासाठी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने 22 वाहनांची व्यवस्था केली होती. सर्व वाहनांमध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
वाहत्या किंवा वापराच्या पाण्यात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. पीओपी गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. मूर्ती बनविण्याकरिता वापरण्यात येणारे रंग आणि पीओपीमधील केमिकलयुक्त पदार्थ पाण्यामध्ये मिसळून जलप्रदूषण होते. त्यामुळे पीओपी गणेशमूर्ती विहिरी, नदी आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून विविध ठिकाणी कुंड निर्माण करण्यात आले आहेत. घरगुती विसर्जनासाठी फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी महापालिकेने चार वाहनांची सुविधा केली होती. मात्र, या वाहनांना प्रतिसाद मिळाला नाही. केवळ दोन ठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन तलावांवरही गर्दी
मात्र, पाचव्या दिवशी शहरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठय़ा संख्येने केले जाते. या पार्श्वभूमीवर विसर्जनाची सोय नसलेल्या परिसरात फिरत्या वाहनांची व्यवस्था केली होती. महापालिकेने 12 ठिकाणी वाहने आणि कर्मचारी नियुक्त केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही 10 वाहने उपलब्ध केली होती. पाचव्या दिवशी विविध विसर्जन तलावांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. विसर्जनाची सोय नसलेल्या परिसरात फिरत्या वाहनांमधील टाकीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः हनुमाननगर, सहय़ाद्रीनगर, जुना धारवाड रोड, हिंदवाडी, महांतेशनगर अशा विविध परिसरातील भाविकांनी वाहनांमधील टाकीमध्ये विधिवत पूजन करून गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
महापालिकेच्या वाहनांमध्ये अडीचशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपलब्ध केलेल्या वाहनांमधील टाकीत दीडशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तृप्त मनाने गौरी माघारी
दोन दिवस माहेरच्या कोडकौतुकाचा आनंद घेऊन तृप्त मनाने सोमवारी गौरी माघारी परतल्या. त्यांच्या आगमनासाठी महिलावर्गांनी केलेल्या आराशीने घर भरल्यासारखे झाले होते. गौरींच्या पाठवणीमुळे त्या आराशी सुन्या सुन्या झाल्या. लाडक्मया लेकीप्रमाणे महिलांनी गौरींच्या आगमनासह तिच्या जेवणाचा थाट उडवून दिला. तिचे कोडकौतुक करण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. रविवारी गौरी जेवणाचा थाट झाल्यानंतर सोमवारी तिच्या पोटात ठेवण्यात आलेले किवडीने रंगविलेले धागे महिलांनी एकत्र बांधून घेतले. त्यानंतर सहभोजन केले आणि संध्याकाळी गौरींची पाठवणी केली.