आता प्रतीक्षा मान्सूनचीच : मशागतीसह भातपेरणी कामांना जोर
प्रतिनिधी / बेळगाव
चार दिवसांपूर्वी वळिवाचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर पुन्हा वळीव पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. पाऊस गेल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणीबरोबरच मशागतीच्या कामांना जोरदार सुरुवात केली आहे. आता साऱ्यांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. त्यामुळे पावसाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. बुधवारी तर उष्म्यात अधिकच वाढ झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. शहर तसेच उपनगरांमध्ये पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी पावसाने दडी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी त्यालाही जोर नसल्याचे दिसून आले. सध्या खरीप पेरणीच्या कामामध्ये बळीराजा गुंतला आहे. भातपेरणीबरोबरच मशागतीच्या कामांमध्ये बळीराजा आहे. भातपेरणीनंतर भुईमूग, सोयाबिन आणि बटाटा लागवडीकडे वळणार आहे. पेरणीच्या तयारीसाठी शेतकरी गुंतला आहे. सध्या पेरणीमुळे मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. बैलजोड्याही नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी मशागती करत आहे. भातपेरणीही ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच करत आहे.