पुणे / प्रतिनिधी :
Monsoon Maharashtra update महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार पाऊस होत असून, पुढील चार दिवस हा पाऊस कायम राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बंगालच्या ऋउपसागर व अरबी समुद्राकडून येत असलेले बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पाऊस राहणार असून, मान्सूनचा हा शेवटच्या टप्प्यातील पाऊस राहणार आहे. यानंतर मान्सून राज्याला अलविदा करण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. मराठवाडा तसेच विदर्भात याचा प्रभाव अधिक आहे. तेलंगणा तसेच लगतच्या विदर्भाच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात आणखी एक द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याबरोबरच आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ते उत्तराखंडपर्यंत हवेचा ट्रफ आहे. या सर्वांच्या प्रभावामुळे देशभर पाऊस होत आहे. खास करून उत्तराखंड व पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात मुसळधार पावसाने झोडपले आहे. याबरोबरच वायव्य भारत वगळता संपूर्ण देशभर यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अधिक वाचा : नाशिकमध्ये अपघातानंतर खासगी बस पेटली, 12 जणांचा होरपळून मृत्यू
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
दरम्यान, मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला असून, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तरप्रदेश, उत्तराखंडच्या भागातून तो माघारी फिरला आहे. यामुळेही या भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस होत आहे.
महाराष्ट्रात दमदार पाऊस
मराठवाडा, विदर्भात गेले दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणातही वादळी पाऊस होत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात यलो अलर्ट असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात वादळी पाऊस राहणार आहे. मंगळवारपर्यंत पावसाचा प्रभाव राज्यभर राहणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.