श्रावण तोंडावर, मागणीत घट
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत असल्याने दर स्थिर असलेले पहायला मिळत आहे. ढबू, कारली, गाजर, बीन्स, ओली मिरची, काकडी, दोडकी, वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे दर स्थिर झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. मात्र श्रावण तोंडावर आल्याने मांसाहाराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे शनिवारी भाजीपाल्याची विक्री कमी झाली होती.
शनिवारच्या किरकोळ आठवडी बाजारात कोबी 20 रुपये, फ्लॉवर 20 रुपये, बटाटा 30 रु. किलो, कांदे 25रु. किलो, ढबू 80रु. किलो, कारली 60 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, बीन्स 60 रु. किलो, ओलिमिरची 80रु. किलो, वांगी 70 रु. किलो, काकडी 80 रु. किलो, टोमॅटो 60 ते 70 रु. किलो, दोडकी 70 रु. किलो, कोथिंबीर 5 रुपये पेंडी, शेवग्याच्या शेंगा 20 रुपयाला एक पेंडी, मेथी 10 रुपयाला एक पेंडी, पालक 20 रुपयाला चार पेंड्या, शेपू 20 रुपयाला तीन पेंड्या, लाल भाजी 15 ला एक तर 20 ला दोन पेंड्या असा दर आहे.
यंदा पावसाला उशिराने प्रारंभ झाल्यामुळे नवीन भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. नवीन उत्पादन होत नसल्याने भाजीपाला आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दर हळुहळू वाढू लागले आहेत. विशेषत: 120 ते 100 रुपये असणारा टोमॅटो मात्र 60 ते 70 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र इतर भाज्यांचे दर चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे. श्रावण तोंडावर आल्याने मांसाहाराला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे किरकोळ भाजी बाजारात विक्री थंडावल्याचे पहावयास मिळत आहे.
टोमॅटो दरात घट, कांदा दरात वाढ
शंभरी गाठलेल्या टोमॅटो दरात घसरण झाली आहे. 120 रुपयाने विकला जाणारा टोमॅटो 60 रुपये किलोवर आला आहे. मात्र कांदा दरात हळुहळू वाढ होऊ लागली आहे. 20 ते 25 रुपये किलो असणारा कांदा 30 ते 35 रुपये झाला आहे. शिवाय येत्या काळात कांद्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
फळा-फुलांची आवक
श्रावण तोंडावर आल्याने बाजारात फळा-फुलांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: श्रावण महिन्यात पूजा, अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे आतापासूनच बाजारात फळा-फुलांची आवक वाढू लागली आहे.