सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
Kolhapur News : संस्थानकाळात करवीर संस्थान व गजराज यांचे नाते अतूट असेच होते.राजर्षी शाहू महाराजांच्या लवाजम्यामध्ये सोन्याची झुल पांघरलेले,गळ्यात सोनसाखळ्या,पायात सोन्याची कडी असे विविध सुवर्णालंकारांचा थाट असणारे गजवैभव होते.छत्रपती शाहू महाराज स्वत: या हत्तींवरील सोन्याच्या अंबारीमध्ये बसून बाहेर जात असत.गजराज,मोतीगज,जंगबहाद्दर,भवानी शंकर,मौलाबक्ष, बर्चीबहादूर असे महाराजांचे अनेक लाडके हत्ती होते.परंतु केवळ हौसेखातर हत्ती पाळणे असे महाराजांनी कधीही केले नाही.त्यांची आबाळ गैरव्यवस्था होऊ नये म्हणून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेशही काढले होते.यामध्ये हत्तीसाठी माडांचे संरक्षण करणारा ऐतिहासिक आदेश आजही वन्यजीव संरक्षणासाठी दिशादर्शक असाच आहे.
राधानगरीमध्ये त्यांनी वास्तुशास्त्राचा अद्भूत नमुना असणारी, या बलाढ्या हत्तींच्या वास्तव्यासाठी भक्कम पाषाणातील ‘हत्तीमहाल’ सारखी वास्तू साकारली.तेथील हत्ती बांधण्यासाठी असणाऱ्या पोलादी कड्या, दगडी मोठाल्या भिंती अजूनही त्याची साक्ष देत आहेत.उन्हाळ्यात वैरण कमी पडू लागली की संस्थानातील अनेक हत्ती याच राधानगरीच्या हत्ती महालात आणले जात असत.इसवी सन 1908 ला राजर्षी शाहू महाराजांनी फॉरेस्ट ऑफिसर, मामलेदार व महालकरी यांच्यासाठी राधानगरीच्या जंगलाबाबत एक महत्त्वपूर्ण हुकूम काढला.
हा हुकुम असा.. ‘भुदरगड पेट्यातील वाकीघोल, दाजीपूर वगैरे भागात माडांची जेवढी झाडे असतील त्या झाडांचा उपयोग हत्तींकरिता आहे. ती झाडे कोणीही न तोडता निगा चांगली राहणेसाठी रावसाहेब फॉरेटस्ट आफिसर व भुदरगड मामलेदार व त्या भागाकडील महालकरी यांसी हुकूम देण्यात येऊन बंदोबस्त ठेवणेबद्दल मे. रावबहादूर सरसुभे यांजकडे कळविणेत यावे’ यामध्ये शेवटी खुद्द राजर्षी शाहू महाराजांची स्वाक्षरी देखील आहे.
बाजार भोगाव परिसरातील कोलीक पडसाळी परिसरात तर ‘शिवारण्य’ म्हणून हत्तींची पैदास करणे, त्यांना मुक्त संचारासाठी राखीव जंगल,पाण्यात डुंबण्यासाठी मोठाले तलाव हा एक वेगळाच प्रयोग हत्तींच्या प्रेमासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता. येथे हत्तींच्या संरक्षणार्थ बांधलेले मैलोन्मैल पसरलेले बांधीव खंदक हे त्याची साक्ष अजूनही देत आहेत.
आजरा, भुदरगड, राधानगरी परिसरात अजूनही जंगली हत्तींचा वावर आहे.कालांतराने वाढलेला शेतीचा परिसर,मानवी वस्ती,जंगलातील वाढता हस्तक्षेप यामुळे दैनंदिन जीवनात हत्तींमुळे अडथळा येत असला तरी सर्वप्रथम या निसर्गातील संपत्तीवर या मुक्या प्राण्यांचाच अधिकार आहे, ही शिकवण आपल्या जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी याच आदेशानुसार दिली होती. इतकेच काय तर त्याची अंमलबजावणीही त्यांनी स्वत:करून दाखवलेली होती.निसर्ग,पर्यावरण वन्यजीव प्रेमी तसेच सामान्य जनता व प्रशासन यांना इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा हा संस्थानकालीन आदेश एक महत्त्वपूर्ण साक्षीदारच म्हणावा लागेल.