सविसावा
भगवंताना संतांचे विलक्षण प्रेम. त्यामुळे ते रंगून जाऊन संतमहिमा सांगू लागले. ते म्हणाले, उद्धवा, ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते, त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात, त्यांची जडता, संसारभय आणि अज्ञान नाहीसे होते. उद्धवा! तेजोमूर्ती अग्नीची सेवा जे करू जाणतात, त्यांचे थंडी, अंधार व भय अग्नि निवारण करतो. तो जवळ असला की, थंडी नाहीशी होते, त्याच्या उजेडाने अंधार नाहीसा होतो आणि त्याला देव मानून त्यांची पूजा केल्याने भय निवारण होते. त्याप्रमाणेच सत्संगतीचाही परिणाम होत असतो. त्या संगतीने त्रिविध तापांचे निवारण होते, थंडी म्हणजे द्वंद्वापासून होणारी पीडा, साधु समूळ नाहीशी करून टाकतात. साधकाच्या मनात एकच ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे ही बाब ठसवून टाकतात. त्यामुळे साधकाच्या मनातला अपपर भव नष्ट होतो. साधकाला झालेल्या आत्मज्ञानामुळे त्याच्या मनातला अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. भयामध्ये मरणासारखं दुसरे भय नाही ते ज्ञानी साधु निवारण करतात. इतकेच नव्हे, तर जन्ममरणही दूर करतात. ते दीनांसाठी पूर्ण दयाळू आहेत. मी साधू अग्निसमान आहेत असे म्हटलं खरं पण साधुना अग्नीची उपमा देणेही चुकीचे आहे कारण साधु हे अग्नीहूनही श्रेष्ठ आहेत. कसे ते ऐक. अग्नीपाशी भयंकर धूर असतो आणि साधु क्रोधरहित व धूमरहित असतात. अग्नि हा अधम व उत्तम या दोघांनाही पोळतो परंतु साधु हे सर्वांना सारखेच सुखदाते असतात. साधूची संगती धन्य धन्य होय. ते आपल्या संगतीने जडांचे जाड्या नाहीसे करतात. मनुष्याला मी कर्ता आहे असे वाटून स्वत:चा फार अभिमान वाटत असतो म्हणून कर्तेपणाची जाणीव नष्ट करून ते माणसाचे जाड्या घालवून टाकतात. त्यामुळे कर्माचे महत्त्वच नष्ट होते. वाट्याला जे काम आलं ते करून टाकलं अशी माणसाची भावना होते आणि त्यात आपण विशेष काही केलं असंही त्याला वाटत नाही. त्यामुळे कर्माचे, कर्मत्व मोडते. अशा पद्धतीने त्यांच्या संगतीत राहणाऱ्या शिष्यांना ते संसार सागरातून तारतात. संसारसागराला क्षणोक्षणी भरती येऊन तो अमर्याद वाढत असतो आणि मनुष्यही त्यात अधिकाधिक वाहवत जातो. त्यांत गटंगळ्या खाता खाता लोकांना त्यातून स्वत:च्या कर्तुत्वावर बाहेर पडू असा विश्वास वाटत असतो परंतु त्यांच्याच्याने ते शक्य होत नाही. मग काय वाटेल ते करून यातून बाहेर पडायचेच अशा विचाराने ते अधर्माचे आचरण करायला मागेपुढे पहात नाहीत. अधर्माचे कर्म त्यांना तात्पुरते अडचणीतून सोडवते परंतु त्यांचा शेवट नरकात होतो. जे वाट्याला आलेले कर्म कर्तव्य म्हणून पार पाडतात ते स्वर्गात जातात परंतु हे कर्म ते निरपेक्षतेने करत नसल्याने त्याचे फल भोगण्यासाठी त्यांना पुन्हा पृथ्वीवर यावे लागते. ह्याप्रमाणे संसारी लोक स्वर्गात व नरकात भोवऱ्याप्रमाणे गिरक्या खात असतात. जोपर्यंत ईश्वर कृपेने त्यांची एखाद्या साधूची भेट होत नाही तोपर्यंत संसारी लोक संसारसागरामध्ये खालवर गटंगळ्या खात असतात. अशा गटांगळ्या खाणाऱ्या मंडळीना संसार सागरातून सज्जनरूप नौकाच सुखाने तारून नेते. आता ही नौका कशी असते ते ऐक. साधू लोकांनी काम, क्रोध ताब्यात ठेवलेले असतात त्यामुळे ते सदैव शांतीरूप असतात. कामक्रोधरहित शांती हाच नावेचा अछिद्रपणा होय. ती ब्रह्मज्ञानाने बळकट असल्यामुळे खरी सुखरूप आहे. कामक्रोधादि भयंकर जलचरांना आमिष खाण्याकरिता ह्या नावेजवळ कधीच येववत नाही. त्यामुळे साधक सुखरूप राहतो. तात्पर्य, सत्संग हा सर्वांना तारक आहे. या नावेची एक गोष्ट मोठी अपूर्व आहे. ती ही की, ती कल्पांतीही जुनी म्हणून होत नाही आणि मोठ्या धारेतल्या भोवऱ्यातही तिला बुडविता येत नाही. ती आपल्या संगतीने सर्वानाच तारते. पण उद्धवा! या नावेचा आणखी एक चमत्कार आहे. तो हा की, जे ह्या नावेच्या ‘वर’ चढतात ते बुडतात आणि ‘तळाला’ राहतात ते तरतात, हे तू लक्षात ठेव. उद्धवाला देवांचं बोलणं फार गूढ वाटलं म्हणाला देवा हे बोलणं जरा उलगडून सांगा त्यावर देव हसून म्हणाले, अरे सद्गुरूंची कृपा सगळ्यांच्या वर सारखीच असते पण काही लोकांना आपण सद्गुरुंपेक्षा शहाणे आहोत असं वाटतं आणि ते स्वत:चा शहाणपणा दाखवायला जाऊन सद्गुरुंच्यापेक्षा उच्चासनावर बसायचा प्रयत्न करतात. साहजिकच त्यांना सद्गुरू कृपेचा लाभ होत नाही पण जे नावेच्या तळात म्हणजे सद्गुरूंच्या पायापाशी बसलेले असतात त्यांना मात्र सद्गुरुकृपेचा पूर्ण लाभ मिळतो आणि ते संसारसागरात डुबक्या मारत न बसता पलीकडल्या तीरावर अलगद पोहोचतात.
क्रमश: