करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात गेली दोन दिवसात अचानक झालेला ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा, केळी, सोयाबीन, उडीद, तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसानीचे आकडे मागून घ्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मुंबई येथे नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. बैठकित सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ प्रा. शिवाजीराव सावंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दाखवले. यावेळी तात्काळ मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
याचबरोबर करमाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मंजूर केलेली ४५ लाख तसेच प्रशासकीय इमारत दोन कोटी व टाऊन हॉल साठी तीन कोटी रुपये या निधीला स्थगिती दिली असून ही स्थगिती उठवावी असे निवेदन महेश चिवटे यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र शिवसेना मंत्र्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी अमोल भोसले यांनी केली. तसेच नियोजन मंडळ व इतर समित्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूक देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मनीष काळजे यांनी केली.
मोहोळ तालुक्यातील रखडलेली विकास कामासाठी निधी देण्याची मागणी चरण चौरे यांनी केली. या बैठकीनंतर बोलताना प्रा. सावंत म्हणाले की, पुढील आठवड्यात पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांची यादी त्यांच्यापुढे मांडणार असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त विकासाची कामे सोलापूर जिल्ह्यात करून घेऊ. या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, अमोल शिंदे, चरण चवरे, मनीष काळजे उपस्थित होते.