राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा पलायनाचा प्रयत्न, न्यायालयाकडून रेखण्याचा आदेश
कोलंबो / वृत्तसंस्था
महागाईचा आगडोंब उसळल्याने राजीनामा द्यावा लागलेले महिंदा राजपक्षे यांच्या जागी पंतप्रधान म्हणून श्रीलंकेत विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील प्रमाणवेळेनुसार त्यांचा गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शपथविधी झाला. या कार्यक्रमाला मोजके नागरिक उपस्थित होते.
विक्रमसिंघे 73 वर्षांचे असून ते युनायटेड नॅशलन पार्टी या पक्षाचे नेते आहेत. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी नव्या पंतप्रधानांसह प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर निर्णयाची घोषणा झाली. विक्रमसिंघे हे यापूर्वी चारवेळा या देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
विविध पक्षांचा पाठिंबा
विक्रमसिंघे यांना सध्याच्या सत्ताधारी श्रीलंका पोडुजना पेरामुना पक्षाचे बरेच संसद सदस्य, विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षाचा एक मोठा गट, समाज जन बलवेगाया पक्षाचे काही सदस्य आणि काही छोटे पक्ष यांनी विक्रमसिंघे यांना पाठिंबा घोषित केला आहे. महागाईचा भडका शमविणे आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही महत्वाची आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.
पलायनाचा प्रयत्न
विक्रमसिंघे यांच्या शपथविधीपूर्वी गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायानाचा प्रयत्न केला होता असे वृत्त पसरले होते. बराच काळ त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, नंतर त्यांच्या वतीने ते देशातच असल्याचा दावा करण्यात आला. मधल्या काळात श्रीलंका सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर देश सोडून न जाण्याचा आदेश बजावला. राजपक्षे, त्यांचे बंधू असणारे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि इतर अधिकारी यांच्यापैकी कोणीही देश सोडून जाऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
2020 मध्ये दारुण पराभव
विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीचा 2020 च्या संसदीय निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. स्वतः तेही पराभूत झाले होते. सध्याही त्यांच्या पक्षाचे मोजकेच सदस्य संसदेत आहेत. मात्र आता बदलत्या परिस्थितीत त्यांना पुन्हा पंतप्रधानपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या पक्षात फूट पडून साजिथ पेमदासा यांनी नवा पक्ष स्थापन केला होता.
भारताच्या पथ्यावर…
श्रीलंकेतील सत्तापालट भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. विक्रमसिंघे हे भारताचे पक्षधर मानले जातात. त्यांनी चीनच्या श्रीलंकेतील हस्तक्षेपाला, तसेच अर्थव्यवस्थेवरील चीनच्या प्रभावाला विरोध केला होता. श्रीलंकेची आजची दुर्दशा ही चीनच्या कर्जाच्या जाळय़ात सापडल्यानेच झाली आहे, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता पुन्हा विक्रमसिंघे पंतप्रधानपदी आल्यानंतर भारताशी या देशाचे संबंध नव्या जोमाने सुधारु लागतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.