आपल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱया बोलघेवडय़ा नेत्यांच्या उपद्व्यापाला कायद्याने बंधने घालण्याचे टाळले गेल्याने किंवा त्यांच्याकडे असणाऱया मतांचा विचार करून त्या त्या काळातील राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने देशात नेहमीच जातीय किंवा धार्मिक दंगली झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील बहुतांश धार्मिक दंगली आहेत. द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱया किंवा मुद्दामहून दोन समाजात भांडण लागेल अशी कृती करणाऱया व्यक्तींना कायद्याने जर चाप बसवला तर अशा घटना टाळता येतात. पण कायदा जर हतबल झाला तर मात्र अशा लोकांचे फावते. हे नुकत्याच झालेल्या दिल्लीतील घटनेने दिसून आले आहे. दिल्लीत जहांगिरपुरा येथे हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर झालेला हल्ला सध्या देशभर चर्चेत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 21 लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडून गेल्यानंतर यातील एकेक पदर उलगडू लागले आहेत. जामा मशिदीच्या जवळ मिरवणूक पोहोचली तेव्हा अन्सार नावाच्या एका व्यक्तीने मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालायला सुरूवात केली आणि नंतर दगडफेक सुरू झाली. हे जसे उघडकीस आले आहे तसेच या मार्गाने मिरवणूक काढण्यास पोलिसांची परवानगी नव्हती आणि या परवानगी नसलेल्या मिरवणुकीत शस्त्रे नाचवली गेली हेही उघडकीस आले आहे. त्यामुळे मिरवणुकीवर दगडफेक करणारे किंवा मिरवणुकीत शस्त्रे नाचवणारे हे दुसऱयाचा द्वेष करणारे नक्कीच होते आणि काही ना काही निमित्ताने त्यांना हा वाद दंगलीपर्यंत पोहोचवायचाच होता हे स्पष्टपणे दिसतच आहे. ही घटना घडली असतानाच जुन्या हुबळी शहरात हिंसाचाराची एक घटना घडली. अभिषेक हिरेमठ नावाच्या व्यक्तीने मशीदीवर भगवा फडकवण्याचे छायाचित्र व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले आणि शनिवारच्या मध्यरात्री हनुमान मंदिर, पोलिस स्थानक आणि रुग्णालयांवर जमावाने दगडफेक केली. या हिंसाचारात 12 पोलीस जखमी झाले असून दहा पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी 40 जणांना अटक केली असून पुढचे दोन दिवस या शहरात जमावबंदी असणार आहे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घडलेली घटना असो किंवा देशाच्या वेगवेगळय़ा भागात घडलेल्या घटना असोत, या सर्वांच्या मागे आहे तो धार्मिक विद्वेष. तो पसरवतो कोण? प्रत्यक्ष दंगलीत उतरतो कोण? या दंगलीत बळी जातो कोणाचा? याचा विचार केला तर सर्वसामान्य नागरिकच यात बळी पडतात हे लक्षात येईल. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात शांतता समित्यांचे आयोजन केले जात होते. त्या काळात मुस्लिम समाजातील सांगलीतील एक ज्ये÷ विचारवंत एच. के. कडलास्कर यांनी एक भाषण केले होते आणि त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजातील सर्वसामान्य माणसांना आवाहन केले होते की, दोन्ही बाजूने दंगल घडवणाऱयांची पोटे भरलेली आहेत. त्यांना त्यांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी ते स्वतः तलवार घेऊन रस्त्यावर उतरणार नाहीत, तर ते लोक तुमची-आमची मने द्वेषाने भरतील. एकदा आपले माथे भडकले की ते अलगद त्या गर्दीतून बाजूला होतील. तुम्ही-आम्ही एकमेकांच्या विरोधात झुंजून रस्त्यावर मरून पडू. मग त्यांचे उद्देश सफल होतील आणि पुन्हा तेच लोक समाजाचे नेते म्हणून पुढे येतील. त्यामुळे हिंदू असो की मुस्लिम, दोन्ही समाजातील गरिबांनी लक्षात घ्यावे की या द्वेषातून कधीही उंच माडय़ा असणाऱया लोकांचे बळी जात नाहीत. त्यांच्यावर कोणाचाही हल्ला होत नाही. दंगलीत सर्वसामान्य माणूसच बळी ठरतो आणि त्यांच्यातीलच काही लोक तुरुंगात खडी फोडायला जातात. ज्यांनी दंगल भडकावली ते नामानिराळे ठरतात आणि राज्यकर्त्यांच्या जवळ पोहोचून सत्तेचे लाभार्थी होतात. कडलास्कर यांनी नंतरच्या काळात याबाबत एक पुस्तिकाही लिहिली आणि त्यामध्ये तितक्मयाच तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून भारतातील हिंदू मुस्लिमांना आपला एकोपा कधीही न तोडण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. या पुस्तिकेत त्यांनी जी मते मांडली आहेत त्याच पद्धतीने भविष्यकाळात दंगली घडल्या. या दंगली घडवणारे दोन्ही बाजूचे लोक कोणत्या पद्धतीचा विचार करणारे असतील याचाही त्यांनी आपल्या पुस्तिकेत उल्लेख केला होता आणि वैशिष्टय़ म्हणजे भविष्यात मिरजे सारख्या शहरात अशी दंगल कोणत्या कारणाने घडू शकेल याचाही अंदाज त्यांनी वर्तवला होता. तो अंदाज तंतोतंत तसाच 2009 साली खरा ठरला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुस्लिम समाजात सुधारणांचा आग्रह धरणाऱया एका विचारवंताने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातील ज्या प्रवृत्तीच्या लोकांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले होते, त्या प्रवृत्ती आजही दोन्ही धर्मात तशाच पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांच्या कृतीतून माथे भडकलेली मंडळी अगदी छोटय़ा छोटय़ा कारणांचे निमित्त करून सुद्धा एकमेकांना खिजवणे, कुरापत काढणे आणि त्याचे निमित्त करून दंगल घडवणे यात धन्यता मानत असतात. वास्तविक अशा मंडळींची माहिती पोलिसांना असतेच. मात्र त्यांच्या असलेल्या राजकीय जवळीकीमुळे अशा समाजकंटकांवर वेळोवेळी कारवाया होत नाहीत. हे द्वेष पसरवणारे लोक कधी कोणत्या नेत्यांना शरण जातील आणि कोणते नेते त्यांना पाठीशी घालतील याचा धरबंद न राहिल्याने पोलीस आणि प्रशासन अशा बाबतीत हतबल ठरते. अंतिमतः त्याचे परिणाम गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि जातीय/धार्मिक दंगली वाढण्यात होतो. हे थांबवायचे असेल तर प्रत्येक राज्यातील राजकीय पक्षांनी स्वतःमध्ये आधी सुधारणा केली पाहिजे. दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱया लोकांना त्यांच्या मागे कितीही मतांचा गठ्ठा असला तरी भिक न घालता पोलिसांना त्यांचे काम करू देण्यास आणि प्रशासनाला अशा मंडळींना हद्दपार करण्यापासून रोखायचे जरी थांबवले तरी असे गुंड मोडीत निघतील. सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई आणि त्यात या भागातील शांतता समित्या सक्रिय झाल्या, संवेदनशील भागात पोलिसांचा वावर वाढला की आपोआपच गुन्हेगारांवर मर्यादा येतात.
Trending
- बेळगावला मोठे उद्योग आणणार
- तरुणांना रोजगार, मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट
- चिकोडीत काँग्रेसची प्रचारात आघाडी
- चव्हाट गल्ली सासनकाठी शहरात दाखल
- जिल्ह्याबाहेरून आलेल्या उमेदवाराला परत पाठवा
- इअर टॅगिंगसाठी प्रशासन कधी जागे होणार?
- अनगोळ येथील शेवटच्या बस थांब्यापर्यंत बस सुरू
- काजू उत्पादकांना दराची केवळ अपेक्षाच