आमदार डॉ. देविया राणे : जलवाहिनी कामाचा प्रारंभ
प्रतिनिधी/ वाळपई
भिंरोंडा पंचायत क्षेत्रातील काही गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होत होती. ती सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांकडे केली होती. याची दखल घेऊन भिरोंडा पंचायत क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी प्रकल्प मंजूर करून हल्लीच या कामाचा प्रारंभ केला होता. या पाणी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते मे महिन्यात पूर्ण होणार असल्याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले.
भिरोंडा पंचायत क्षेत्रात नव्याने घालण्यात येणाऱ्या जीवाहिनी कामाचा प्रारंभ आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आमदार राणे बोलत होत्या. यावेळी भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, पंचायत सदस्य रूपाली गावकर, मनीषा पिळयेकर, बाबुराव गावडे, विदेश नाईक, किरण गावडे, रंजना राणे उपस्थित होत्या.
जलशुध्दिकरण प्रकल्पासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी प्dराकल्पाला मंजुरी दिली व यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. सदर काम अंतिम टप्प्यात असून शक्य तेवढ्या लवकर सदर काम पूर्ण करून प्dराकल्प कार्यान्वित केला जाईल, असे आमदार राणे यांनी सांगितले.
भिरोंडा पाणी या प्रकल्पाचा फायदा संपूर्ण पंचायत क्षेत्राला होणार असून त्यांना आता 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुध्दिकरण केलेले पाणी संपूर्ण पंचायतक्षेत्रात पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षाची ग्रामस्थांची पाण्याची टंचाई कायमस्वरूपी मिटणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
वाळपई पाणीपुरवठा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता मदन देसाई यांनी सांगितले की भिरोंडा पंचायत क्षेत्रासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने यंत्रणा सज्ज केली जात आहे.